निवृत्त वायूदल प्रमख प्रदीप नाईक
SAKAL
सोलापूर : सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाचे स्वरूप पाहता भारताला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. यापूर्वी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय वायुदल हे पूर्णपणे जबाबदार आणि निर्णायक ठरले होते. मुत्सद्देगिरी ही हार्ड पॉवरच्या विरुद्ध असते, असा एक सिद्धांत आहे. अमेरिका हार्ड पॉवर आहे, म्हणून तो मुत्सद्देगिरीकडे लक्ष देत नाही. पण भारताची मुत्सद्देगिरी खूप चांगली आहे. पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री खूप चांगली कामगिरी करत आहेत. आपण जगात अनेक देशांसोबत सकारात्मक संतुलनाची भूमिका बजावत आहोत. फक्त पाकिस्तानशी शत्रुत्व सोडले तर अन्य देशांशी संबंध चांगले आहेत. तरीही आपला मुख्य शत्रू चीनच आहे. पण चीन सध्या या घडामोडीत शांत आहे, असे भारताचे माजी वायुसेनाप्रमुख प्रदीप नाईक यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. भारताचे माजी वायुसेनाप्रमुख (एअर चीफ मार्शल) प्रदीप नाईक हे नुकतेच सोलापूरला आले होते. यावेळी ‘सकाळ’चे पत्रकार प्रकाश सनपूरकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
नेत्यांची सुरक्षा बदलण्याची वेळ
एखाद्या देशाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी हवाई हल्ल्याचे तंत्र या युद्धात वापरले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. नेतृत्वाच्या सुरक्षेचे आधुनिकीकरण करायला हवे. सुरक्षा यंत्रणेचा नव्याने विचार व्हावा. ड्रोन व मिसाईल या गोष्टींचाही नव्याने विचार करावा लागेल. या युद्धात आपण पाहिले की अत्यंत स्वस्त तंत्राच्या वापराने महागड्या शस्त्रसज्जतेचा पराभव करता येऊ शकतो. त्यामुळे या प्रकारचे तंत्र आपल्याला विकसित करता आले पाहिजेत. लो-कॉस्ट सिस्टिम पण परिणामकारक असलेले तंत्र विकसित व्हावे. एआयचा वापरही त्यात असेल. चुटकी वाजवली की ते होणार नाही, पण काही वर्षे त्यावर काम करावे लागेल. त्यासाठी आपल्याला शस्त्रनिर्मितीचे क्षेत्र विकसित करावे लागेल.
लोकांचा कणखरपणा वाढावा
काऊंटर फोर्स स्ट्रॅटेजी व काऊंटर व्हॅल्यू स्ट्रॅटेजी हे दोन प्रकार असतात. पहिली ही सैन्यदलाशी संबंधित असते. दुसरी स्ट्रॅटेजी ही लोकांच्या रोजच्या जीवनात प्रभावी ठरते. कारण लढाई आता सीमारेषेवर नाही, तर आपल्या शहरात व घराजवळ होऊ लागली आहे. आपल्या नागरिकांना युद्धस्थितीत जगण्याचा काही अनुभव नाही. युद्धकाळात किंवा प्रतिकूल स्थितीत जगायला शिकायला पाहिजे. इराण किंवा इस्रायलमध्ये जे नुकसान झाले आहे ते पाहिल्यावर कळते की तेथील लोक किती नुकसान सहन करून देशासाठी पुन्हा उभे राहत आहेत. आपल्या नागरिकांना युद्धाचा अनुभव नाही. त्यामुळे आपण सिलिंडर मिळत नाही अशी कुरकुर करत आहोत. देशातील लोकांनी प्रतिकूल स्थितीत एकदिलाने जगणे शिकायलाच हवे.
यापुढील युद्धे पूर्वीसारखी नसतील
पुढील युद्धे पूर्वीसारखी असणारच नाहीत. सायबर वॉरसारख्या गोष्टी विकसित होत आहेत. डीआरडीओसारख्या संस्थांनी मिसाईल्स उत्तम विकसित केली आहेत; पण अन्य अत्याधुनिक शस्त्रतंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही त्यांनी यावे. डीआरडीओ, हिंदुस्तान एरोनॉटिक्स सारख्या संस्थांचे नव्या तंत्राच्या दृष्टीने पुनरुज्जीवन करायला हवे. आपली एअरक्राफ्ट क्षमता अधिक विकसित व्हायला हवी. पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे ‘आत्मनिर्भर भारत’साठी संरक्षण क्षेत्रात वेगवान संशोधन करत मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. आपली एअरक्राफ्ट व मिसाईल सिस्टिम खूप चांगली आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये आयएसीसीएस (इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सिस्टीम) उपयुक्त ठरली. काही जुन्या तंत्रांना आपण एआयच्या मदतीने नव्याने विकसित करता येईल. आपल्या मिसाईल्सची प्रगती आहे. एअर डिफेन्समध्ये रशियन एस-४०० परिणामकारक आहे. ‘आकाश’ची कामगिरी देखील चांगली आहे. त्यांची टार्गेटवर मारा करण्याची क्षमता भक्कम आहे. आपण एआयच्या मदतीने एडी गन्सचा चांगला उपयोग करू शकतो.
ज्ञानसंपन्नता भरपूर, पण उत्पादन कमी
भारतात ब्रेन भरपूर आहेत. त्या तुलनेत आपली उत्पादन क्षमता कमी आहे. यासाठी मास स्केल उत्पादन व अफॉर्डेबल टेक्नॉलॉजी विकसित व्हावी. अनेक स्टार्टअप्स चांगले काम करत आहेत; तरीही खूप अत्याधुनिक शस्त्रे आपल्याकडे नाहीत. क्रिटिकल टेक्नॉलॉजी देशात विकसित व्हायला हवी. कोणताही देश ही क्रिटिकल टेक्नॉलॉजी आपल्याला देणार नाही. आपल्यालाच देशात विकसित करावे लागेल. ते अवघड नाही; पण ते उद्दिष्ट निश्चित करून निर्धाराने करावे लागेल. खासगी क्षेत्राने या कामासाठी गुंतवणूक करण्याचे धाडस करावे. संरक्षण क्षेत्रात मागणी निश्चित नसते, मग पुरवठा कसा ठरवणार, याचा विचार न करता योग्य भूमिकेतून आधुनिक व्हायला हवे. पण आता खासगी क्षेत्र व सरकार एकत्रितपणे संरक्षण क्षेत्रात काम करत आहेत, ते खूप चांगले आहे.
चीनबद्दल पूर्ण तयारी हवी
चीन आकाराने मोठा देश आहे. त्यांचे तंत्रज्ञान विकसित आहे; पण चीनची आर्मी कधी लढलेली नाही. भारताचे लष्कर मात्र ॲक्टिव्ह आहे. अनेक प्रकारच्या युद्धसरावातून आपण नेहमी जात असतो. हे आपल्यासाठी फायदेशीर आहे. चिनी मालाबद्दल लोक जागरूक होत आहेत. यावर्षी गणेश चतुर्थीला चायनीज गणेश विकले गेले नाहीत. लोक आता ओळखायला लागले आहेत. शेवटी, आपण आपली क्षमता एवढी वाढवायला हवी की धडक मारण्याची पूर्ण तयारीच हवी. ड्रोन टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे. ड्रोन बाहेरून घेण्याची वेळ येऊ नये. आपले ड्रोन उत्पादन प्रचंड वाढायला हवे. ड्रोन कोणत्याही दुर्गम व धोकादायक भागात खूप काम करू शकतात. त्यामुळे मानवी हानी वाचवली जाऊ शकते. ड्रोन तंत्राकडे अधिक व विशेष लक्ष दिले गेले पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.