सोलापूर : उजनी धरणातून सोडलेले पाणी कर्नाटकने उमराणी बंधाऱ्यात अडवल्याने खाली पोहोचू शकले नाही. परिणामी आठ गावांतील शेती - पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न दोन राज्यांतील असल्याने तो राज्य सरकारच्या स्तरावरचा आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनही हतबल झाले आहे. मात्र, लोकप्रतिनिधींनाही राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
उजनीतून भीमा नदीत चार हजार ४०० क्युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. ते कर्नाटकने उमराणी बंधाऱ्यात अडवल्याने त्या खालील लवंगी ते बरूरपर्यंच्या आठ गावांतील शेती धोक्यात आली आहे. भीमापात्र कोरडे पडल्याने पिके कशी जगवायची, हा सवाल शेतकरी विचारत आहेत. तर तालुक्यातील सर्वात मोठ्या मंद्रूप गावासह त्या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींकडे तगादा लावतानाच आंदोलनाचाही इशारा दिला आहे. दरम्यान, कर्नाटकने पाणी अडवल्याने उजनीतून पाणी सोडणे थांबविण्यात आले आहे. पण उजनीतून अपुरे पाणी सोडले आहे.
आणखी पाणी सोडल्यास उमराणी बंधाऱ्यातून पाणी खाली सोडण्यात येईल, अशी भूमिका कर्नाटकातील विजयपूर जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. हा दोन राज्यांतील प्रश्न असल्याने जलसंपदा विभाग राज्य सरकारकडे बोट दाखवत आहे. तर शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची चिन्हे असल्याने लोकप्रतिनिधीही याप्रश्नी पाठपुरावा करत आहेत. मात्र, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
‘या‘ कारणामुळे निर्माण झाली समस्या
सोलापूर शहरासाठी दरवर्षी उजनी धरणातून तीन - चारवेळा पाणी सोडावे लागायचे. त्यासाठी भीमा नदीतून १८-२० टीएमसी पाणी सोडले जायचे. उशिराने का होईना पाणी सोडले जात होते. त्याचा भीमाकाठच्या महाराष्ट्र- कर्नाटकातील शेती- गावांना पिण्याच्या पाण्यासाठी लाभ होत असल्याने समस्या उद्भवली नाही. आता समांतर जलवाहिनी झाल्याने सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडण्याची आवश्यकता उरली नाही. केवळ उन्हाळ्यातच शेतीसाठी पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. तर कर्नाटकने उमराणी येथे बंधारा बांधून त्यावर अनेक पाण्याच्या योजनाही राबविल्या आहेत. खाली पाणी सोडल्यास शेतीसह त्या पिण्याच्या पाण्यांच्या योजनांवरही गंडांतर येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कर्नाटकने उजनीतून सोडलेले पाणी अडवले आहे.
दोन राज्यातील विषय आहे
उमराणी बंधाऱ्यातून पाणी सोडण्याचा प्रश्न दोन राज्यांतील आहे. त्यामुळे यासाठी राज्य सरकार स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. लवकरच निर्णय होईल. त्यानंतर उमराणी बंधाऱ्यातून खाली पाणी सोडण्यात येईल.
- सुबिरवेंद्र खांडेकर, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर
पाणी न सोडल्यास आंदोलन
उमराणी बंधाऱ्यातून खाली पाणी सोडावे, यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यांनी लवकरच पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पाणी न सोडल्यास २३ फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्यात येईल.
- अप्पाराव कोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य, मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.