मुंबई : राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. पण, मुख्यमंत्रिपदावर कोण विराजमान होणार याची उत्सुकता कायम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यानंतर आता शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचे नाव पुढे करणार याची महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे.
शिवसेनेच्या आमदारांची आज मातोश्रीवर बैठक झाली. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. त्यावेळी आमदारांनी उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह आमदारांनी धरला आहे. पण, उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. आघाडीकडूनही उद्धव ठाकरे यांच्या नावासाठी आग्रह करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांचेच नाव सध्या सर्वाधिक आघाडीवर आहे. पण, उद्धव यांनी मुख्यमंत्रिपद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला तर, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत यांच्या नावांचीच चर्चा सुरू आहे. उद्धव यांनी नकार दिला तर, राऊत किंवा शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात येत आहे.
पाच वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेचाच
मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव चर्चेत असताना, काँग्रेसकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरे म्हणाले, 'शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचे नाव द्यायचे हा त्यांच अंतर्गत विषय आहे. उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांच्या सारखी व्यक्ती जर मुख्यमंत्रिपदावर असेल तर, सरकार पाच वर्षे व्यवस्थित चालवण्यास मदत होईल.' तिन्ही पक्षांच्या चर्चेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदासाठी आग्रह धरलेला नाही. त्यामुळं पाच वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.