नाशिक - भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष असून भाजपला सत्तास्थापनेसाठी पंधरा ते वीस आमदारांची गरज आहे. गिरीश महाजन हे आमदार जमवण्यात कुशल आहेत. त्यामुळे शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह न धरता, १६ मंत्रीपद घेऊन महायुती कायम ठेवावी, असा अनाहूत सल्ला महायुतीतील घटक पक्षाचे नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
नाशिकला पावसाळी नुकसान पाहणीच्या दौऱ्यानिमित्ताने आलेल्या आठवले यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या साक्षीने महायुतीच्या राज्यातील संभाव्य तडजोडीच्या शक्यतेचा दावा केला. आठवले म्हणाले की, राज्यात आतापर्यत कधीही अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला राबविला गेलेला नाही. त्यामुळे शिवसेनेने फार ताणून न धरता उपमुख्यमंत्रीपदावर मार्ग निघू शकतो. सत्ता वाटपात आतापर्यंत अडीच वर्षांचा कालावधीचे सत्तावाटप कधीच झाले नाही. त्यामुळे शिवसेनेने महायुतीत सहभागी होण्याचा अनाहूत सल्ला देतानाच, आठवले यांनी, महाजन यांच्या साक्षीनेच, आगामी मंत्रिमंडळ हे ४३ मंत्र्यांचे असेल. त्यात रिपाईसह छोट्या घटक पक्षासाठी ४ मंत्रीपद राखीव असतील. शिवसेनेच्या वाट्यासाठी १६ मंत्रीपद असल्याचे सांगतांना अप्रत्यक्षपणे त्यांनी राज्यातील मंत्रिमंडळाचा सत्तावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.