मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ठाकरे सरकारमध्ये मंत्री राहिलेले नवाब मलिक आज १७ महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर आले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना दोन महिन्यांचा जामीन सुप्रीम कोर्टाने मंजूर केलाय.आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मलिक यांना ईडीने अटक केली होती. अखेर त्यांना आज दिलासा मिळाला आहे. यापार्श्वभूमीवर नवाब मलिक यांचा राजकीय प्रवास आपण जाणून घेऊया. (ncp leader Nawab Malik sc give interim medical Bail know his political career)
उद्धव ठाकरे सरकारमध्ये नवाब मलिक यांच्याकडे अल्पसंख्याक, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता खातं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुस्लिम चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. नवाब मलिक मुळचे उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द मुलायम सिंह यादव यांच्या समाजवादी पार्टीसोबत सुरु केली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
महाराष्ट्रात पाच वेळा आमदार राहिलेले नवाब मलिक यांचा जन्म २० जून १९५९ रोजी उत्तर प्रदेशच्या बलरामपूर जिल्ह्यातील उतरोला तालुक्यातील धुसवा गावात झाला होता. नवाब मलिक यांचे पूर्ण कुटुंब १९७० मध्ये उत्तर प्रदेशातून मुंबईमध्ये शिफ्ट झाले. त्यांनी मुंबईच्या अंजुमन हायस्कूलमधून दहावी आणि १९७८ मध्ये बुरहानी कॉलेजमधून बारावी केली. १९७९ मध्ये त्यांनी पदवी याच कॉलेजमधून पूर्ण केली.
नवाब मलिक यांनी सुरुवातीला व्यापारकडे लक्ष दिले होते. त्यांच्या वडिलांचे मुंबईत एक हॉटेल आणि भंगारचं दुकान होतं. काही दिवस मलिक यांनीही भंगारचा व्यवसाय संभाळला. पण त्यानंतर त्यांचा रस राजकारणात वाढू लागला. नव्वदच्या दशकात राम मंदिर आंदोलनाचा मुद्दा पेटत होता. सपा नेते मुलायम सिंग यादव अल्पसंख्याकांमध्ये लोकप्रिय नेते ठरले होते. ६ डिसेंबर १९९२ मध्ये जेव्हा अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यात आली त्यावेळी काँग्रेस सत्तेमध्ये होती. बाबरी घटनेनंतर अल्पसंख्याक लोक काँग्रेसवर नाराज होते. त्यावेळी अनेक मुस्लिमांनी समाजवादी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला.
मुलायम सिंह यांची वाढती लोकप्रियता पाहून नवाब मलिक यांनी सपामध्ये प्रवेश केला आणि आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नवाब मलिक यांनी महाराष्ट्रातील मुस्लिम बहुल नेहरु नगर मतदारसंघातून १९९६ मध्ये सपाच्या तिकीटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली. १९९९ मध्ये पुन्हा त्यांनी त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विधानसभेवर निवडून गेले.
२००४ मध्ये यूपीए सरकार केंद्रामध्ये आल्यास त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेस केला. यानंतर २००४ मध्ये नेहरु नगरमधून त्यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढवली आणि ते पुन्हा जिंकून आले. २००९ मध्ये त्यांनी अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते सलग चारवेळा जिंकले.
२०१४ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा अणुशक्ती नगरमधून निवडणूक लढवली, पण काही मतांच्या फरकाने त्यांना शिवसेनेच्या नेत्याने हरवले. २०१९ मध्ये पुन्हा त्यांनी निवडणूक लढवली आणि ते पाचव्यांदा आमदार झाले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना एनसीपी कोट्यातून मंत्री बनवण्यात आलं. २०२० मध्ये त्यांना राष्ट्रवादी मुंबईचा अध्यक्ष बनवण्यात आलं होतं.
नवाब मलिक यांच्या कुटुंबात पत्नी महजबीन, मुलगा मराज, आमिर आणि मुली निलोफ, सना आहेत. मलिक यांचा जावई समीर खान आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात समीर खान याला अटक झाली होती. नवाब मलिक यांनी वारंवार भाजपवर टीका केली आहे. मलिक कायमच भाजपच्या 'हिट लिस्ट'वर राहिलेले आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.