मुंबई - एसटी बस ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून, सर्वसामान्य नागरिक त्यातून प्रवास करतात. त्यांचा हा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 500 नवीन बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. बस खरेदीसाठी लागणाऱ्या निधीपैकी 12.5 कोटी रुपयांचा निधी नजीकच्या काळात, तर उर्वरित निधी हा विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगून ते म्हणाले, की आजही एसटी बस ही ग्रामीण महाराष्ट्राचा आधार आहे. सर्वसामान्य माणसांची ही गरज लक्षात घेऊन त्यांना चांगल्या बसमधून प्रवास करता यावा, हा त्यामागचा उद्देश आहे. महामंडळानेही पुढाकार घेऊन बस स्थानके सुंदर आणि स्वच्छ ठेवावीत, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. वर्धा, देवळी, मूल, बल्लारपूर, सावली, पोंभुर्णा, घुग्गुस, भद्रावती, राजुरा आणि चिमूर बसस्थानकांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी चंद्रपूर, मूल, बल्लारपूर बस स्थानकांच्या कामाचे कार्यादेशही देण्यात आले आहेत. उर्वरित स्थानकांच्या कामांना ही गती देण्यात यावी, ज्या कंत्राटदारांना बसस्थानकांची कामे देण्यात आली आहेत त्यांच्याकडून स्थानकांच्या विकासाचे काम वेळेत आणि दर्जात्मक पद्धतीने करून घेण्यात यावीत, अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी या वेळी दिल्या. |