सोलापूर : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची लेखी परीक्षा मंगळवारपासून (ता. ११) सुरू होणार आहे. तर इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होईल. विद्यार्थ्यांना आपला परीक्षेचा बैठक क्रमांक कोठे आहे हे माहिती नसते. त्याठिकाणी परीक्षा हॉलमध्ये जाताना अंगझडती घेतली जाते. त्यामुळे अर्धा तास अगोदर केंद्रांवर पोचावे, असे आवाहन बोर्डाने केले आहे.
विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना पेन व पॅड आणि गणित विषय, भूगोल अशा विषयांसाठी लागणारे साहित्यच घेऊन जावे. आपल्याकडे चुकून त्या विषयाची उत्तरे राहिली नाहीत ना, याचीही खात्री करावी. मनावर कोणतेही दडपण किंवा भीती न बाळगता वेळेत सर्व प्रश्नांची उत्तरे सोडवावीत, त्यासाठी अभ्यासाबरोबरच उत्तरे लिहताना सुरवातीला वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवावेत. जेणेकरून शेवटी वेळ कमी पडल्यास हक्काचे गुण जाणार नाहीत, असेही शिक्षणतज्ज्ञांचे आवाहन आहे.
विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्याच्या १० मिनिटे अगोदर उत्तरपत्रिका दिली जाते. त्यात बैठक क्रमांकासह अन्य माहिती अचूक लिहायची असते आणि उत्तरे लिहिण्यासाठी प्रत्येक पानांवर विद्यार्थी रेघाही (समास आखणे) ओढतात. प्रत्येक तासाला बेल वाजते आणि शेवटी १० मिनिटे जास्त देण्यापूर्वी शेवटची बेल वाजविली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेकडे लक्ष ठेवून संपूर्ण पेपर सोडवावा, जेणेकरून चांगले गुण मिळू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास करावा
कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने चोख नियोजन केले असून त्यासाठी भरारी पथके, बैठे पथकांची नियुक्ती केली जाईल. सरमिसळ पद्धतीने परीक्षा होणार असून विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून मनात कोणतीही भीती न बाळगता परीक्षा द्यावी. विद्यार्थ्यांना शेवटी १० मिनिटे जास्त दिली जातात. त्यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न सोडविले का, त्याची उत्तरे अचूक आहेत का, उत्तरपत्रिकेवरील बैठक क्रमांक व माहिती अचूक लिहिले असल्याची खात्री करावी.
- औदुंबर उकीरडे, विभागीय सचिव, पुणे बोर्ड
हॉल तिकिटावर असेल वेळापत्रक
विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बोर्डाकडून दिलेल्या हॉल तिकिटावर प्रत्येक विषयाचे वेळापत्रक दिलेले आहे. परीक्षेला जाताना हॉल तिकीट विसरले किंवा प्रवासात कोठे पडले तरी घाबरून जाऊ नये. वर्ग शिक्षकास किंवा शाळा-महाविद्यालयातील शिक्षकाशी संपर्क करून त्यांच्याकडून पुन्हा हॉल तिकीट मागवून घेता येईल, असेही बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पेपर सुरू होऊन १० मिनिटांहून अधिक वेळ झाल्यावर कोणी विद्यार्थी आल्यास त्याला परीक्षेला बसता येणार नाही, ही बाब सर्वांनीच लक्षात ठेवावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.