वर्धा - 'आम्ही नरेंद्र मोदींची "मन की बात' सांगू इच्छित नाही, तर लोकांची "मन की बात' ऐकू इच्छितो. मी देशाचा "चौकीदार' बनू इच्छितो, असे म्हणणारे नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर मोजक्या उद्योगपती, श्रीमंतांचे हितरक्षण करीत त्यांचे "भागीदार' झाले,'' असा आरोप कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथील जाहीर सभेत केला. येथील सर्कस ग्राउंडच्या विस्तीर्ण मैदानावर गांधी जयंतीनिमित्त ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभेपूर्वी, "गांधी संदेश पदयात्रे'द्वारे जनतेला अभिवादन करीत हजारो समर्थकांसह राहुल गांधी सभास्थळी पोचले. या वेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच गुलाम नबी आझाद, पी. चिदंबरम, ए. के. अँटनी, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्राचे प्रभारी अशोक गेहलोत, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, आमदार रणजित कांबळे, महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. चारुलता टोकस यांच्यासह कॉंग्रेसच्या देशभरातील ज्येष्ठ नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. राहुल गांधी पुढे म्हणाले, 'गांधीजी आयुष्यभर हिंसा आणि घृणेपासून दूर राहिले. आज महात्मा गांधींचे नाव घेऊन राज्य करणारे नेमके याउलट करीत आहेत. गांधीजींनी त्याकाळी जगाच्या सुपर पॉवरशी अहिंसेच्या मार्गाने प्रेमाने लढा दिला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. मोदींनी "मेड इन इंडिया'ची भाषा केली. मात्र, ती आज फोल ठरल्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत. गांधीजींनी सत्याचा आग्रह धरला, पण हे सरकार असत्याचा आग्रह धरीत आहे. "राफेल' विमानाच्या करारात अनिल अंबानींना भागीदारी मिळवून दिली. दहा दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या त्यांच्या कंपनीला कंत्राट मिळाले. यापोटी 30 हजार कोटी रुपये एकही विमान बनविण्याचा अनुभव नसलेल्या अंबांनीच्या घशात घातले. फ्रान्सच्या माजी अध्यक्षांनी गौप्यस्फोट केला, यांचे अर्थमंत्रीही "राफेल'चा करार कसा बदलला, हे माहीत नाही म्हणतात. ही कसली देशाची चौकीदारी आहे?'' प्रत्येकाच्या खात्यात 15 लाखांचे आश्वासन, दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य मोबदला, काळा पैसा परत, शेतकऱ्यांना कर्जमाफी अशा सर्व बाबतीत दिलेली आश्वासने निव्वळ फोल ठरली. काळ्या पैशाच्या नावाने लोकांना रांगेमध्ये उभे करून त्यांचे पैसे बॅंकेत जमा केले आणि तो पैसा अंबानी, विजय मल्ल्या, नीरव मोदी आदींना वाटला. आपण मोदी-भाजपला "ट्राय केले; पण त्यांचे इंजिन फेल झाले, टायर फुटला. आता त्यांना पुरे झाले म्हणण्याची वेळ आली आहे. युवकांना रोजगार मिळवून देण्याकरिता आम्ही कटिबद्ध राहू. त्याकरिता प्रयत्नांची शर्थ करू. "मेड इन वर्धा', "मेड इन महाराष्ट्र', "मेड इन इंडिया' या नावांनी उत्पादने यावीत, हे आमचे लक्ष्य असल्याचेही ते म्हणाले. गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे यांचीही या वेळी भाषणे झाली. प्रास्ताविक अशोक चव्हाण यांनी, तर संचालन विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आभार मानले. क्षणचित्रे - पदयात्रेने सभास्थळाकडे जाताना काही मुलींनी राहुलजी, राहुलजी, अशी हाक दिली. मुलींच्या आग्रहाखातर राहुल गांधी गाडीतून उतरले व त्यांच्याशी संवाद साधला. या अनुभवाने मुली भारावून गेल्या. - "पहले लडे थे गोरों से, अब लडेंगे चोरों से,' या घोषणांनी हजारो समर्थकांनी सभास्थळ आणि परिसर दणाणून सोडला होता. - सभेच्या वेळी गर्दीत उभ्या असलेल्या दिव्या सोमकुंवर या चिमुकलीकडे राहुल गांधी यांचे लक्ष गेले. रामनगरात राहणाऱ्या दिव्याला त्यांनी लगेच मंचावर बोलावले व तिच्याशी आत्मीयतेने संवाद साधला. - सभा संपल्यानंतर परत जाताना कठड्याजवळ जात राहुल गांधी यांनी लोकांशी हस्तांदोलन केले. त्यामुळे सुरक्षारक्षकांची एकच धावपळ उडाली. त्यांनी महिलांशीही संवाद साधला. - गांधी संदेश पदयात्रा आणि जाहीर सभेकरिता विदर्भासह राज्यातील विविध भागांतून आलेल्या कॉंग्रेसजनांनी शहर व्यापून गेले होते. सभास्थळाच्या सभोवतालचा परिसर ट्रॅव्हल्स, चारचाकी वाहनांचे तळच झाला होता. शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. |