मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून पुन्हा एकदा त्यांनी सरकारला लक्ष्य बनवले. 370 कलम रद्द केल्यानंतर पेढे वाटले, देशभर जल्लोष केला मात्र, 371 मतदारसंघात घोळ झाला, त्यावर कोणी का बोलत नाही? पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधून केलेल्या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
370 कलम हटविल्यानंतर आम्ही रोजगार निर्माण करू असं मोदी म्हणाले मात्र, ज्या राज्यात 370 कलम नाहीय त्या राज्यांत अजूनही रोजगार का निर्माण करू शकले नाहीत. मोठ्या संख्येने तरूण रोजगारासाठी अजूनही वणवण फिरत आहेत.
दरम्यान, राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरवातीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकास्र सोडले. महाजन पूर पर्यटनात व्यस्त असून सत्तेतील सगळ्या लोकांना माज आला आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी एकूण मतदानापेक्षा अधिक मतदान झाल्याची माहिती बाहेर आली. मात्र, माहिती अधिकाऱ्यांच्या नाड्या मोदी-शहांच्या हातात असल्यामुळे ती लोकांपर्यंत पोहचू शकली नाही. देशाच्या नागरिकांना माहिती द्यायची की नाही, हे आता सरकार ठरवणार, असेही ते म्हणाले. तसेच अमित शहांनी यूएपीएची गरज नसताना तो देशावर लादला, अशा शब्दांत राज यांनी शहांनाही लक्ष्य बनवले.
दरम्यान, राज ठाकरे यांनी गौप्यस्फोट करताना सांगितलं की, “भाजपामधील एक वरिष्ठ व्यक्ती सांगत होती की, उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष हे एकत्र जरी आले तरी निवडणूक आम्हीच जिंकणार. कारण आमच्याकडे वोटर मशिन्स आहेत. कोण बोललं, कधी बोललं हे बाळा नांदगावर यांना माहिती आहे”.
गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात 14000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गेल्या 45 वर्षांतील सर्वात मोठी बेकारी सध्या भारतात आहे. सरकारविरोधात पत्रकारांना लिहू दिलं जात नाही. त्यांची मुस्कटदाबी केली जाते. खरी वस्तुस्थिती लोकांसमोर येत नाही, येऊही दिली जात नाही, असेही ठाकरे म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.