angar (mohol) nagarpanchayat election
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीची पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. नगराध्यक्षपदासाठी माजी आमदार राजन पाटील यांच्या सूनबाई प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी अर्ज भरला असून त्याच पहिल्या नगराध्यक्षा होतील, हे निश्चित आहे. त्यांच्याच दोन उमेदवारांनी नगरसेवकासाठीही अर्ज भरले आहेत. दुसरीकडे चार दिवसांत विरोधकांकडून एकही अर्ज भरलेला नाही. अपक्ष उमेदवारास अर्जासोबत पाच तर राजकीय पक्षाच्या उमेदवारास एक सूचक लागतो. ‘पाण्यात राहून माशाशी वैर नको’, या म्हणीप्रमाणे काहीजण निवडणुकीस इच्छुक असले, तरी त्यांना सूचक मिळणार नाहीत, अशी सध्याची स्थिती आहे.
अनगर ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून त्याठिकाणी पाटील कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे. आजवर ग्रामपंचायत निवडणुकीत कोणीही त्यांना विरोध केला नाही. गावात एकोपा असल्याने विरोधकांनीही कधी त्याठिकाणी लक्ष घातले नाही. सप्टेंबर २०२१ मध्ये अनगर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. आता पहिल्यांदाच नगरपंचायतीसाठी मतदान होत असून त्याठिकाणी एकूण ११ हजार मतदार आहेत.
दरम्यान, नगरपंचायतीच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राजकीय पक्षाच्या उमेदवारास त्याठिकाणी मतदार असलेला एक सूचक लागतो. तर अपक्ष उमेदवारास पाच सूचक घ्यावेच लागतात. ते सूचक देखील तेथील मतदारच असणे आवश्यक आहे. अनगर आणि १२ वाड्यांमध्ये नेहमीच राजन पाटलांचा दबदबा राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात आता कोण निवडणूक लढणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अनगर नगरपंचायतीची स्थिती
एकूण नगरसेवक : १७
सर्वसाधारण प्रवर्गातून : १०
ओबीसी प्रवर्गातून : ५
एससी प्रवर्गातून : २
एकूण मतदार : ११,०३४
नगराध्यक्ष : सर्वसाधारण महिला
६३ वर्षांनंतर अनगरमध्ये पहिल्यांदाच फुलणार कमळ!
महाराष्ट्रामध्ये १ मे १९६२ रोजी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली. तेव्हापासून अनगर ग्रामपंचायतीवर स्व. बाबूराव पाटील, माजी आमदार राजन पाटील यांचीच सत्ता राहिली. याठिकाणी कधीही शिवसेना, भाजप, काँग्रेसचा एकही सदस्य निवडून आला नाही. काही दिवसांपूर्वी राजन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अनगर नगरपंचायतीवर पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलेल. राज्यात भाजप महायुतीची सत्ता असल्याने महायुतीतील कोणताही पक्ष राजन पाटील यांच्याविरोधात अनगर नगरपंचायतीसाठी उमेदवार देणार नाही हे निश्चित आहे. उमेदवार दिलेच तरी त्यांना सूचक मिळण्याची अडचण, मग जिंकण्याची बात तर खूपच दूर, असे बोलले जात आहे.