Rajmata Jijabai Birth Anniversary: छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं स्वराज्य (Swarajya) ही केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा काळ होता. स्वराज्यनिर्मितीच्या कार्यात छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि त्यांच्या मावळ्यांनी आपलं आयुष्य वेचलं, परंतु त्यांच्या मनात स्वराज्याचे संस्कार केले ते राजमाता जिजाऊंनी. त्यांच्या प्रेरणेतूनच मराठा साम्राज्यांची, हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.
राजमाता जिजाऊंचं (Jijabai) आयुष्य नेहमीचं धामधुमीत गेलं. स्वराज्यनिर्मितीच्या काळात कित्येकदा त्यांच्यावर अतिशय कठीण निर्णय घेण्याची वेळ आली. अनेकदा तर शिवबा किंवा स्वराज्य यापैकी एकाची निवड करण्याची वेळ त्यांच्यावरती आली होती. परंतु त्यांनी स्वराज्यासाठी आईचं काळीज नेहमीचं बाजूला ठेवलं आणि रयतेच्या कल्याणासाठी आपल्या पुत्राला लढण्यास प्रवृत्त केले. आज आपण राजमाता जिजाऊंच्या आयुष्यातील असेच काही प्रसंग पाहणार आहोत, ज्या प्रसंगातून त्यांनी स्वराज्यासाठी काय सोसलं याची आपणाला जाणीव होईल.
1. जिजाबाईंचा जन्म लखुजी जाधवराव यांच्या घराण्यात झाला. लक्ष्मणदेव, लखुजी उर्फ लकुजी जाधवराव सिंदखेडकर हे मुळचे देवगिरीकर जाधव घराण्यांतील होते. त्यांच्याकडे सिंदखेडा येथील देशमुखीचे वतन होते. लखुजी जाधवराव व शहाजी राजे यांचे वडील मालोजीराजे निजामशाहीत मनसबदार असल्याने दोघांमध्ये बराच घरोबा झाला होता. म्हणूनच जिजाबाई आणि शहाजी राजे यांचा विवाह झाला, परंतु नंतरच्या काळात या दोन्ही घराण्यांमध्ये वैमनस्य आले. 2. जिजाऊ जेव्हा सात महिन्याच्या गरोदर होत्या तेव्हा जाधवराव आपल्या सैन्यानिशी शहाजी राज्यांच्या मागावर होते. त्यावेळी शहाजीराजांना कल्पना होती की जाधवराव आपल्या लेकीस काही अपाय होवू देणार नाहीत. म्हणून त्यांनी जिजाऊंना विनंती केली की , “तुम्ही कुठे अशा फिरत राहणार? त्यापेक्षा तुम्हाला सिंदखेडास सुरक्षित पोहचवतो.” परंतु जिजाऊंनी त्यांची विनंती धुडकावून लावली. त्या म्हणाल्या, “मला येथेच राहावयाचे, माहेरी जावयाचे नाही.” शेवटी त्यांच्या उदरात स्वराज्याचा मेरुमणी वाढत होता. 3. शिवनेरीवर असताना जिजाऊंनी तेथील शिवाई देवीची मनोभावे उपासना केली. शिवाई देवीच्या नावावरुनच महारांचे नाव शिवाजी असं ठेवलं गेलं. शिवाजी महाराजांनीही आपल्या आईकडूनच स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेतली. बाल शिवबाला न्याय, समता, नितीशास्त्र, धर्मशास्त्र, राजव्यवहार यांचे प्राथमिक शिक्षण जिजाऊंनीच दिले. 4. मुघल व आदिलशहा यांच्यातील तहाच्या अधिन राहून शहाजीराजे कर्नाटक प्रांतात राहू लागले. शिवनेरीसारख्या एकांत स्थळी ना भाऊ ना बंद अशा स्थितीत शिवरायांचे बालपण गेले. जिजाबाई नि शिवबा या मायलेकांचे प्रेम विलक्षण होतं. शिवबाची ही मातृभक्ति शेवटपर्यंत तशीच होती. त्यामुळेच त्यांनी जिजाऊंचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. 5. जिजाऊंनी पुण्यापासून दक्षिण-पश्चिमेस असलेला कोंढाणा स्वराज्यात आअशी मागणी केली. जिजाऊंच्या इच्छेखातर छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या मोहिमेत जाणार होते. परंतु तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली शूर मावळ्यांनी ही मोहीम पार पाडली. कोंढाणा किल्ला स्वराज्यात आला, परंतु तानाजी मालुसरे हे या मोहिमेत धारातीर्थी पडले. त्यावेळी गड आला पण सिंह गेला, असं उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांनी काढले आणि कोंढाण्यास सिंहगड असे नाव दिले.6. 1666 मध्ये शिवाजी महाराज औरंगजेबाच्या भेटीस आग्र्यास गेले होते, तेव्हा आपल्या राज्याची सर्व सुत्रे जिजाऊंकडेच देवून गेले होते. शिवरायांना औरंगजेबाने धोक्याने कैद केलं. मुलाच्या जीव धोक्यात असतानाही शिवराय तिथून सुटून येईपर्यंत जिजामातांनी स्वराज्याची घडी विस्कटू दिली नाही. 7. शिवरायांची लालमहालातील शायिस्तेखानावरील स्वारी ही आणखी एक जोखमीची मोहीम होती. कारण यात शत्रूच्या अतिसुरक्षित भागात घुसून हल्ला करायचा होता. शिवराय या मोहिमेत स्वतः अग्रस्थानी होते. परंतु इथेही जिजामाता शिवरायांच्या मागे ठाम उभ्या होत्या. त्यामुळेच शिवरायांनी लालमहालात घुसून शायिस्तेखानाची बोटे छाटली. तो आयुष्यात पुन्हा स्वराज्याच्या नादाला लागला नाही. 8.अफजल खानाची स्वारी हे स्वराज्यावरील मोठं संकट होतं. शिवाजी महाराजांच्या बंधूचीही याच अफजलखानानं हत्या केली होती आणि याच कपटी खानाला शिवराय भेटणार होते. शिवबा मृत्यूच्या जबड्यात जात आहे हे जिजाऊंना माहिती होतं, परंतु त्यांनी शिवरायांना रोखलं नाही, उलट त्यांना आशीर्वाद दिले. यानंतर पुढे काय झालं ते तर सारं जग जाणतं. शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी दगाबाज अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. आणि स्वराज्यावरील संकट दूर झालं. 9. अफजल खानांची भेट असो वा आग्र्याची भेट जिजाऊंच्या कर्तृत्वावर असलेल्या विश्वासामुळे महाराज निश्चिंत राहिले. जिजाऊंच्या शिवकवणीचा पगडा महाराजांवर इतका होता की, महाराजांना स्त्रियांबद्दल फार आदर होता. त्यांनी आपल्या सैनिक, सरदार वा इतर अधिकारी वर्गास खास बजावले होते की स्वराज्यात स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे.10. जिजामातांनी स्वराज्यात धार्मिक सहिष्णूता पेरली. धार्मिक सहिष्णूतेचे नियम स्वराज्यात पाळले जात. धर्माच्या आधारे भेदभाव होत नसे. एखाद्या व्यक्तीने किंवा सरदाराने धर्मपरिवर्तन केलं, तर त्यास समाजात योग्य स्थान मिळत नसे. परंतू जिजाऊंनी बाजाजी निबाळकरांस मुस्लिम धर्मांतरानंतरही हिंदू धर्मात घेतले. एवढंच नाही तर आपली नात आणि शिवाजी महाराजांची कन्या सखुबाई हिचे लग्न त्यांच्याशी लावून दिले. 11. स्वराज्य स्थापना तर झाली होती, पण शिवरायांचा राज्याभिषेक झाला नव्हता. त्यावेळी राजमाता जिजाबाई आणि सर्व मावळ्यांनी मराठा राजवंश स्थापन करण्यासाठी शिवरायांना राज्याभिषेक करवून घेण्यासाठी उद्युक्त केले. जिजाऊंनीच शिवाजी महाराजांना सिंहासनाचे महत्व पटवून दिल्याने महारांनी राज्याभिषेकासाठी खास 32 मण सोन्याचे सिंहासन बनवून घेतेले. 12. राज्याभिषेकावेळी जिजाऊंचे वय 72 वर्षे होतं. त्यांचं सगळं आयुष्य हे स्वराज्यनिर्मितीत गेलं. असंख्य चांगले वाईच प्रसंगांना त्यांनी धैर्याने तोंड दिलं होते. त्याग, धैर्य आणि धाडसाच्या जोरावर त्यांच्या मुलाने, रयतेचं राज्य निर्माण केले होते. जिजाऊंचं आयुष्य सार्थकी लागलं होते. छत्रपती शिवरायांच्या राज्यभिषेकानंतर अवघ्या 12 दिवसांनी म्हणजेच 17 जून 1674 रोजी पाचाड येथे राहत्या घरी राजामाता जिजाऊंची प्राणज्योत मालवली. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.