मुंबई - ‘‘मी कृषिमंत्री असताना २००४ ते २०१४ या काळात काळात देश अन्नधान्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण तर झालाच शिवाय काही योजनांमुळे दीर्घकालीन फायदेही झाले. त्यामुळे देशातील शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्याचे काम झाले होते. सध्या साखर, कांदा, टोमॅटोपासून अन्य शेती उत्पादनांना दर नाही. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठलीही माहिती न घेता बिनदिक्कत खोटे बोलत आहेत. माहिती न घेता बोलण्यासाठी जे धाडस लागते ते त्यांच्याकडे आहे,’’ अशी सडेतोड टीका करत पंतप्रधान मोदी यांच्यावर शरद पवार यांनी शनिवारी उलटवार केला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आपल्या कृषिमंत्रिपदाच्या काळात अन्नधान्य, कृषी योजना, पीक कर्ज आणि अन्य बाबींवर केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला.‘पंतप्रधान शिर्डीत साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी आले होते मात्र, ते शरद पवारांचे दर्शन घेऊन गेले,’ अशी मिश्कील टिप्पणी करत''
राज्यातील इतर प्रश्नांपेक्षा त्यांना माझी चिंता वाटत असल्यानेच त्यांचे माझ्याकडे लक्ष असल्याचा उपरोधिक टोलाही पवारांनी लगावला. शरद पवार म्हणाले, ‘‘ पंतप्रधानपद हे प्रतिष्ठेचे आहे. त्यामुळे त्यांनी माहिती देताना नीट द्यायला हवी. मी कृषिमंत्री होण्यापूर्वी देशात अन्नधान्याची टंचाई होती. मी २००४ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच अमेरिकेतून गहू आयात करण्यासंदर्भातील फाइल माझ्या टेबलवर आली.
तेव्हा नाइलाजाने अमेरिकेतून गहू आयात करावा लागत होता. त्यानंतर आम्ही काही निर्णय घेतले आणि पुढील काळात गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस यांच्या हमीभावात दुप्पट वाढ केली.
जागतिक अन्नसंघटनेने २०१२ मध्ये तांदळाचे विक्रमी उत्पादन झाल्याचे मान्य केले. परंतु पंतप्रधान मोदी यंनी शिर्डीतील कार्यक्रमात मांडलेले मुद्दे वस्तुस्थितीपासून दूर आहेत. पंतप्रधान हे पद घटनात्मक असल्याने त्याची प्रतिष्ठा राखायला हवी, असे वाटते. पंतप्रधान अनेक जाहीर कार्यक्रमांत माझ्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल कौतुक करत होते.
बारामतीतील ‘सेंटर फॉर एक्सलन्स’च्या उद्घाटनाला आल्यानंतर त्यांनी ‘ पवार कृषीमंत्री असताना मी त्यांना गुजरातला बोलावून घेत होतो. त्यावेळी शेती क्षेत्रात काही कमतरता तर नाही ना? असे विचारायचो.’ असे भाषणात सांगितले. माझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात विज्ञानभवनात माझे कौतुक करताना सांगितले होते की, कृषी क्षेत्रातील आधुनिकता, इनोव्हेशन, पेरणी आणि काढणीपश्चात तंत्रज्ञान याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे तसेच उसाच्या क्षेत्रावर पवार कित्येक तास बोलू शकतात, असेही सांगितले होते.’’
दुपटीपेक्षा अधिक वाढ
‘‘ मी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या हमीभावात भरीव वाढ कशी करता येईल. याचा निर्णय घेतला. गहू, तांदूळ, कापूस, सोयाबीन यांच्या हमीभावात दुपटीपेक्षा जास्त वाढ केली गेली. तांदळाचा हमीभाव २००४ ला ५५० होता तर २०१४ ला तो १३१० रुपये झाला. गहू ६३० वरून १४००, सोयाबीन ७४० वरून २५००, कापूस १७५० वरून३७००, ऊस ७३० वरून २१००, हरभरा १४०० वरून ३१००, मका ५०५ वरून १३१० तर तूर १३६० वरून४३०० रुपयांवर हमीभाव गेला. ही वाढ १३८ ते २१६ टक्क्यांपर्यंत आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानेच ही माहिती दिली आहे,’’ असे पवार म्हणाले.
देश स्वयंपूर्ण बनला
पवार म्हणाले, ‘‘ नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन’चा फळबागांना मोठा फायदा झाला. राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा आढावा घेतला तर कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून गेला असे आपल्या लक्षात येईल. अन्न धान्याबाबत काही ठरावीक राज्यांचा उल्लेख केला जायचा. मात्र ईशान्येकडील जो पट्टा होता त्याचा उल्लेख होत नसे.
त्यामध्ये आसाम, बिहार, छत्तीसगड, ओडिशा, पूर्वांचल यामध्ये भात पीक होते. त्यावेळी या राज्यांना भरीव मदत करून देशातील उत्पादन १०० लाख टनाच्या वर नेऊन दुसरी हरितक्रांती केली गेली. ‘नॅशनल फिशरिज डेव्हलपमेंट बोर्ड’ २००६ साली स्थापन केल्याने त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला. आम्ही राबविलेल्या योजनांमुळे देश अन्नधान्यांबाबत स्वयंपूर्ण बनला.’’
पीक कर्जाच्या व्याजात घट
‘‘ पीक कर्जाचा व्याजदर १८ टक्के होता तो ४ टक्क्यांवर आला. काही जिल्ह्यांत तर शून्य टक्के दराने व्याज आकारण्यात आले. २०१२ -१३ साली दुष्काळ निर्माण झाला त्यावेळी चारा छावण्या देखील सुरू करण्यात आल्या होत्या.
जनावरांच्या छावण्यांना पशुखाद्य आणि चारा पुरवण्यात आला. जळालेल्या फळबागांच्या उभारणीसाठी एकरी ३५ हजार रुपयांचे अनुदान दिले, हा एक धाडसी निर्णय होता. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन योजनेतून साडे दहा लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. या कामाची नोंद काही आंतरराष्ट्रीय संघटनांनीही घेतली.’’ असे पवार यांनी नमूद केले.
६२ हजार कोटींची कर्जमाफी केली
‘‘ शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबतो आहे हे लक्षात आल्यानंतर ६२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली होती. त्यात ५२ हजार कोटी लहान आणि सीमांत शेतकऱ्यांची थकबाकी होती तर १० हजार कोटी ‘ओटीएस’ अंतर्गत कर्जमाफी करण्यात आली
होती.अन्नधान्याच्या हमीभावात वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले. देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला. भारत जगामध्ये चौथ्या प्रथम क्रमांकाचा देश झाला तर गहू उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा देश झाला. ऊस, कापूस, ज्यूट, दूध, फळे, मासे आणि भाजीपाला यांच्या उत्पादनात देखील भारत पहिल्या- दुसऱ्या क्रमांकावर राहिला,’’ असे पवार यांनी सांगितले.
‘इंडिया’ला गती द्यावी लागेल : पवार
‘‘भाजपच्याविरोधात एकत्रित आलेल्या ‘इंडिया’ आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र येण्याबाबत कोणतेही मतभेद नसले तरी विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत काही मतभेद दिसत आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये बदल दिसतो.
पण, लोकसभा निवडणुकांबद्दल पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणार नाही. मात्र ‘इंडिया आघाडी’च्या कामाला गती द्यावी लागेल. लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत,’’ असे पवार म्हणाले. ‘‘ मी लवकरच दिल्लीला जाणार आहे. तेथे इंडिया आघाडीची बैठक घेण्याबाबत चर्चा करण्यात येईल. मराठा आरक्षणासाठी जे उपोषणास बसले आहेत. त्यांना माहिती आहे की आरक्षण कोण देऊ शकते?
त्यामुळे मला प्रश्न विचारण्यापेक्षा जे आरक्षण देऊ शकतील त्यांना विचारायला हवा. मराठा आरक्षणाकरता राज्यात आंदोलने सुरू आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी सरकारने सामंजस्याची भूमिका घ्यावी. ज्यांची मागणी आहे त्यांनी आणि सरकारने एकत्र बसून चर्चा करावी,’’ असे मत पवार यांनी मांडले.
राज्यात वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझे आहे. याबाबत ‘इंडिया’ आघाडीतील राज्यातील इतर पक्षाबरोबर होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.