नागपूर : ‘‘कुणी हनुमान चालिसा म्हणत असेल तर त्यावर एवढा राडा कशाला? असा सवाल करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते व गृहविभागाने चुकीच्या पद्धतीने प्रकरण हाताळल्याचा आरोप केला. शिवसेनेच्या नेत्यांनी या प्रकरणातून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न चालवला, पण ती मिळणार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. नागपुरातून मुंबईला जाण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर फडणवीस पत्रकारांसोबत बोलत होते. ते म्हणाले, ‘‘कुणाच्याही घरावर आंदोलन करायला आमचा विरोध आहे. परंतु कुणी हनुमान चालिसा म्हणणार, म्हणून एवढी माणसे गोळा करायची का?
कुणी हल्ला करायला जाणार नव्हते. खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांना राष्ट्रीय नेता बनविण्याचा विडा शिवसेनेने उचलला की काय? अशी शंका त्यांनी व्यक्त केली. राणा दांपत्य गेले असते, एखाद्या कोपऱ्यात हनुमान चालिसा पठण केला असते तर त्याची कुणी दखलही घेतली नसती. परंतु शिवसेनेच्या नेत्यांना या प्रकरणातून सहानुभूती मिळेल असे वाटते. पण सहानुभूती मिळणार नाही.’’
राऊत, वळसे पाटील यांच्यावर टीका
‘‘गृहमंत्री दिलीप वळसे पाटील असताना गृहमंत्रालयाचे बारा वाजले. यासाठी त्यांना कमीपणा वाटला पाहिजे. ‘राष्ट्रवादी’ने गृहमंत्रालयाचे बारा वाजवले. आपले अपयश झाकण्यासाठी ते भाजपच नाव घेतात,’’ असेही फडणवीस म्हणाले. खासदार संजय राऊत यांना शिवसेनेत आणि बाहेर, कुठेही किंमत नाही. त्यांचे वक्तव्य शिवराळ असून घरी कुटुंबीय ऐकू शकत नाही. त्यांचे काहीही अस्तित्व नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.