schools
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांवरील सगळ्याच शिक्षकांनी शुक्रवारी (ता. ५) राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यात सोलापूर शहर-जिल्ह्यातील हजारो शिक्षक सहभागी होणार आहेत. त्यामुळे शिक्षकच शाळेत नसतील तर विद्यार्थ्यांनी शाळेत जायचे की नाही, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. परंतु, त्याचे ठोस उत्तर ना शिक्षण संचालक ना शिक्षणाधिकाऱ्यांकडेही नाही हे विशेष.
शालेय शिक्षण विभागाचा १५ मार्च २०२५ रोजीचा संचमान्यतेचा निर्णय रद्द करा, सर्वोच्च न्यायालयाच्या ‘टीईटी’ सक्तीच्या आदेशावर राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी, शिक्षणसेवक पद रद्द करावे, अशा प्रमुख मागण्यांसाठी शिक्षकांनी राज्यातील सगळ्याच शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सगळे शिक्षक आंदोलनात नसतील, असा दावा शिक्षणाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे उपलब्ध शिक्षकांवर शाळा सुरु ठेवल्या जातील, असेही अधिकारी म्हणाले. पण, शाळांमध्ये शिक्षक नसतील तर विद्यार्थ्यांनी जाऊन काय करायचे, असा प्रश्न पालकांसमोर आहे.
शासन स्तरावरून शाळा बंद आंदोलन होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरु आहे. पण, ठोस तोडगा अद्याप निघालेला नाही. दरम्यान, शुक्रवारी (ता. ५) कोणतीही शाळा बंद राहणार नाही, याची दक्षता मुख्याध्यापकांनी घ्यावी, ज्या शाळा बंद राहतील, त्या शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कमचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येईल, असा इशारा माध्यमिक व प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिला आहे.
...म्हणून राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन
संचमान्यतेचा १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयात बदल तथा दुरुस्ती करणे आवश्यक आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या ‘टीईटी’ सक्तीच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी, यासह विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. शिक्षक, मुख्याध्यापक सघंटनांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. ५) राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन केले जात आहे.
- तानाजी माने, अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, सोलापूर
अधिवेशनापूर्वीच शिक्षक संघटना आक्रमक
राज्याचे हिवाळी अधिवेशन पुढील आठवड्यापासून (सोमवारी) सुरु होत आहे. तत्पूर्वी, ‘टीईटी’ची सक्ती व संचमान्यतेचा शासन निर्णय, याला शिक्षकांनी तीव्र विरोध केला आहे. त्यातून शिक्षकांची नोकरी जाणार आहे, हजारो शिक्षक अतिरिक्त होऊन त्यांना अन्य शहर-जिल्ह्यात जावे लागणार आहे. नवी शिक्षक भरती थांबणार असून कमी पटाच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत. या पार्श्वीमीवर शिक्षक आक्रमक झाले असून याचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. शिक्षकदेखील मुंबईच्या आझाद मैदानावर जाण्याची तयारी करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.