तात्या लांडगे
सोलापूर : शेती, जागा विकून संस्थापकास लाखोंचे डोनेशन दिले. काहींनी शेती- घर गहाण ठेवून पैसे भरले, त्याचे व्याज दुप्पट झाले, पण पगार अजून सुरू नाही, अशी हजारो शिक्षकांची व्यथा आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या भविष्याचे धडे देणारे शिक्षक पाच-दहा वर्षे पगाराविना काम करत असल्याने त्यांच्यावरच आता जगायचे कसे, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे.
घरात कोणी शिकलेला नाही, नोकरीलाही नाही, आई- वडिलांचे हातावरील पोट, अशा स्थितीत इयत्ता बारावी किंवा पदवीला ८५ ते ९० टक्के गुण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी शासकीय महाविद्यालयातून डी.एड.- बी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. आपल्या हुशारीवर निश्चितपणे चांगल्या शिक्षण संस्थेत शिक्षकाची नोकरी मिळेल, अशी आशा त्यांना होती. शिक्षक झाल्यावर चांगली बायको मिळेल, आई- वडिलांची मजुरी- चाकरी थांबेल, कौटुंबिक स्थितीही सुधारेल, या आशेने अनेक तरुण-तरुणींनी शेती, जागा, घर विकून, गहाण ठेवून व्याजाने पैसे काढले आणि संस्थेत डोनेशन म्हणून भरले.
काही शाळांना २० टक्के अनुदान मिळाले, दरवर्षी २० टक्के नैसर्गिक वाढीचाही निर्णय झाला. मात्र, सहा-सात वर्षांनंतरही शाळा ६० टक्के अनुदानावरच आहे. काहींना तर पगारही सुरू नाही. त्यामुळे अनेकजण पार्ट टाइम (शिकवणी, किराणा दुकान, हॉटेल असे) जॉब करत आहेत. दुसरीकडे, अनेकांची गहाण ठेवलेली प्रॉपर्टी व्याज, मुद्दलातच सावकाराच्या घशात गेल्याचीही उदाहरणे आहेत.
१५ मार्चचा शासन निर्णय चिंता वाढविणारा
२००२ मध्ये शिक्षण सेवकाचा शासन निर्णय निघाला आणि तीन वर्षे खूपच कमी पगारात शिक्षक सेवक म्हणून काम करावे लागले. फेब्रुवारी २०१३ पासून ‘टीईटी’चे बंधन घातले आणि आता सर्वांसाठीच (५३ वर्षांखालील शिक्षक) तो नियम लागू करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. याशिवाय दरवर्षी संचमान्यता, आधारबेस्ड पटसंख्येची अट यामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या दरवर्षी वाढत असून अनेक पदे कायमची रद्द होत आहेत. आता नोव्हेंबर २०१२ पासूनच्या सर्वच शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे शासनाने मागवून मान्यतांमधील बोगसगिरी शोधली जात आहे. तत्पूर्वी, नव्या मान्यता, अतिरिक्त शिक्षकांसाठी पटसंख्येचा नवा निकष १५ मार्च २०२५ रोजीच्या शासन निर्णयातून निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे पगार सुरू असो किंवा नसो, आता शिक्षकांसमोर नोकरी टिकविण्यासाठी आपण अतिरिक्त होऊ नये म्हणून पटसंख्या टिकविण्याचे मोठे आव्हान आहे.
माहिती घेऊन पाऊल टाकल्यास पश्चातापाची येणार नाही वेळ
शिक्षक भरतीसंदर्भात शासनाने वेळोवेळी वेगवेगळे निर्णय घेतले. आता खासगी संस्थांना पवित्र पोर्टलमधूनच शिक्षक भरण्यासाठी उमेदवार दिले जातात. मुलाखतीतून योग्य उमेदवाराची निवड करणे अपेक्षित आहे. इच्छुक उमेदवारांना बदललेल्या शासन निर्णयाची माहिती असायला हवी. संस्थेची, रिक्त जागांची माहिती घेऊन, तज्ज्ञांच्या सल्ल्याने अर्ज करावा, जेणेकरून पुढे पश्चात्तापाची वेळ येत नाही.
- सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.