who is shivajirao garje esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivajirao Garje: उपजिल्हाधिकारी ते आमदारकी, आड आलेल्या अजित पवारांनीच संपवला वनवास, कोण आहेत शिवाजीराव गर्जे ?

MLC Election Result: निवडणुकीतील घोडेबाजाराच्या चर्चेत गर्जे हेच आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक कमकुवत उमेदवार असल्यामुळे त्यांना धोका असल्याची चर्चा होती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवाजीराव गर्जे हे विधान परिषदेवर निवडून आले आणि आमदारकीशी दहा वर्षे सुरू असलेला त्यांचा पाठशिवणीचा खेळ संपला. त्यांना २०१४ पासून आतापर्यंत चार वेळा वेगवेगळ्या कारणांनी आमदारकीने हुलकावणी दिली. त्यापैकी एका वेळी त्यांच्या आमदारकीच्या आड आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच त्यांचा वनवास संपवला.

मूळचे नगर जिल्ह्यातील पाथर्डीचे असलेले शिवाजीराव गर्जे हे शासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी होते. प्रामाणिक अधिकारी म्हणून लौकिक असलेल्या गर्जे यांनी राजकारणात येण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला आणि २००२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रामुख्याने पक्षाची कार्यालयीन जबाबदारी सांभाळणारे गर्जे हे शरद पवार यांचे विश्वासू बनले.

पक्षातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०१४ मध्ये त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचे ठरले. परंतु त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. श्रीरंग बारणे आणि लक्ष्मण जगताप यांच्या लढतीत ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते.

नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई असल्यामुळे अनेक नेत्यांचे लाडके होते. त्यांच्यासाठी निंबाळकर यांच्यासह अन्य नेते-आमदारांनी शरद पवार यांच्याकडे आग्रह धरला. त्यात स्वतः अजित पवार हेसुद्धा होते. त्यामुळे गर्जे यांची निश्चित झालेली उमेदवारी शेवटच्या क्षणी बदलून ती नार्वेकर यांना देण्यात आली.

विनायक मेटे यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यांची जागा गर्जे यांना देण्याचे ठरले होते. परंतु मेटे यांना अपात्र ठरविण्याबाबत विधान परिषदेच्या सभापतींनी चालढकल केली.

महाविकास आघाडीचे सरकार २०१९मध्ये सत्तेवर आल्यानंतर राज्यपाल कोट्यातील दोन जागा रिक्त होत्या. त्यापैकी एका जागेसाठी पक्षाने गर्जे यांचे नाव पाठवले होते. परंतु तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निर्णय घेतला नाही. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. महाविकास आघाडीने राज्यपालांकडे पाठवलेल्या बारा नावांमध्ये खडसे यांचे नाव होते. त्या नावाला भाजपचा विरोध असल्यामुळे राज्यपालांनी यादी अडवल्याची चर्चा होती.

दरम्यानच्या काळात जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी पुन्हा गर्जे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. परंतु तिथे त्यांच्याऐवजी खडसे यांचे नाव घालण्यात आले आणि राज्यपाल कोट्यातून नाव सुचविण्याचे आश्वासन गर्जे यांना देण्यात आले. ती यादी प्रलंबितच राहिली आणि गर्जे यांच्या आमदारकीला पुन्हा खो मिळाला.

पक्षबांधणीचे फळ

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शिवाजीराव गर्जे यांनी अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या राज्यभरातील संघटनाची माहिती असलेल्या गर्जे यांचा पक्षाच्या बांधणीसाठी चांगला उपयोग झाला. त्यामुळे अजित पवार यांनी त्यांना प्राधान्याने आमदार करण्याचे ठरवले होते. राज्यपाल कोट्यातील यादी आधी झाली असती तर त्या कोट्यातून ते आमदार झाले असते. परंतु ती प्रलंबित राहिल्याने आता निवडणुकीच्या माध्यमातून गर्जे यांना संधी मिळाली.

निवडणुकीतील घोडेबाजाराच्या चर्चेत गर्जे हेच आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक कमकुवत उमेदवार असल्यामुळे त्यांना धोका असल्याची चर्चा होती. परंतु अजित पवार यांनी ही निवडणूक व्यक्तिशः लक्ष घालून लढवली आणि शिवाजीराव गर्जे आमदार झाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT