meghna naidu share experience with working vikram gokhale sur lagu de
meghna naidu share experience with working vikram gokhale sur lagu de  SAKAL
मनोरंजन

Meghna Naidu: विक्रम गोखलेंनी सांगितलेली कोणती गोष्ट लक्षात राहिली? मेघना नायडूने सांगितला अनुभव

Devendra Jadhav

अभिनेत्री मेघना नायडूने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मराठीमध्ये आता ती ‘सूर लागू दे’ चित्रपटात कम करीत आहे. अभिषेक किंग कुमार आणि नितीन उपाध्याय यांच्या ऑडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण विजया एकनाथ बिर्जे यांनी केले आहे. मनोरंजनासोबतच सामाजिक जाणिवेचे भान राखून हा चित्रपट बनविण्यात आला आहे. हा चित्रपट १२ जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री मेघना नायडूने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. यानिमित्ताने मयुरी जाधवने तिच्याशी केलेली खास बातचीत...

: तुम्ही साऊथबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही काम केले आहे. मराठीमध्ये काम करण्याचा अनुभव कसा होता?

-‘सूर लागू दे’ची संपूर्ण टीम कुटुंब असल्यासारखी वावरायची. आम्ही सगळे जण एकत्र बसून जेवण करायचो. चहा व नाश्ता करायचो. त्यामुळे मला हे माझे कुटुंबच आहे असे वाटायचे. मी आतापर्यंत अनेक ठिकाणी काम केले आहे, पण या चित्रपटात काम केल्यानंतर असे लक्षात आले की, इथे आपलेपणा खूप आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जर आपण पाहिले तर तिकडे कलाकार येतात व जातात, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची अजून वेगळी सहा लोक सोबत असतात. त्यांना अजिबात बोलायला वेळ नसतो, पण इथे तसे नव्हते. इकडे सगळे एकत्र यायचे. एकमेकांना फोन करायचे आणि चित्रपटाचे चित्रीकरण वेगवेगळ्या ठिकाणी झाल्यामुळे सगळे जण एकाच ठिकाणी राहत होते. त्यामुळे खूप मजा आली.

: विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्ये यांच्यासोबत काम करून कसे वाटले आणि काय शिकायला मिळाले?

- मला खूप छान वाटले. कारण या चित्रपटात मला विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्ये या दोघांसोबत काम करायला मिळाले. हे दोन्ही कलाकार कमालीचे अनुभवी आहेत. त्यांनी ज्या प्रकारचे काम केले आहे त्या कामामुळेच लोक त्यांना आज ओळखतात, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. विक्रमजी यांनी मला संपूर्ण चित्रपटादरम्यान खूप मदत केली. माझी मराठी भाषा इतकी चांगली नाही, पण या सगळ्यामध्ये माझ्या भाषेचे उच्चार, संवादफेक आणि अभिनय यात माझे काय चुकतेय हे त्यांनी मला वेळोवेळी सांगितले. चित्रीकरण सुरू असतानाच त्यांची तब्येत बरी नसायची. त्यावेळी त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की, आयुष्यात कितीही, काहीही होऊ दे, प्रयत्न सोडू नकोस... त्यांचे हे शब्द माझ्या नेहमी लक्षात राहतील. तसेच सुहासिनीजी इतक्या प्रेमळ आहेत की, त्यांच्याबद्दल मी जितके बोलेन तेवढे कमीच आहे. त्यांच्यामुळे सेटवर नेहमीच खेळीमेळीचे वातावरण असायचे. याचबरोबर सुहासिनीजी खूप दिग्गज अभिनेत्री आहेत असे त्यांनी आम्हाला कधीच जाणवू दिले नाही.

: तू या चित्रपटासाठी मराठी भाषेचे काही वेगळे प्रशिक्षण घेतले का?

- मी पहिल्यापासूनच मुंबईमध्ये राहिलेली मुलगी आहे. मुंबईत राहून मराठी बोलता न येणे किंवा मराठी भाषा न समजणे असे होता कामा नये. आमच्याकडे घरात कामामध्ये मदत करणाऱ्या दोन महिला आहेत. त्यातील एक महिला गेली सोळा वर्षे आणि एक गेली २० वर्षे आमच्याकडे कामाला आहे. त्या दोघीही मराठी भाषिक आहेत. तसेच मी लहान असताना मला ज्या महिलेने सांभाळले ती स्वतः मराठी होती. आजही मी त्या दाम्पत्यांना आई-बाबा अशीच हाक मारते. त्यामुळे माझे मराठी बऱ्यापैकी ठीकठाक आहे. याचबरोबर आमच्या आजूबाजूला राहणारी मंडळीसुद्धा मराठी भाषिक आहेत, तर त्यांच्यासोबत आम्ही मराठी सण सुद्धा साजरे करतो. त्यामुळे प्रशिक्षण घेण्याची वेळ आली नाही.

: तुला तुझा पहिला चित्रपट कधी आणि कसा मिळाला?

- मी माझा पहिला चित्रपट साऊथ चित्रपटसृष्टीत केला आणि या क्षेत्रात पदार्पण केले. मी आमच्या नातेवाईकांकडे साऊथला लग्न समारंभासाठी गेले होते. तेव्हा तिथे माझ्या चुलत भावाचे मित्र आले होते. त्यांनी मला तिथे पाहिले व भावाला म्हणाले की, आम्ही एक चित्रपट बनवत आहोत आणि ही मुलगी दिसायला खूप सुंदर आहे, तर ती चित्रपटात अभिनय करेल का? तेव्हा मी त्यांना ‘हो’ म्हणाले होते. तेव्हापासून मी याच क्षेत्रात काम करत आहे.

: जर तू अभिनय क्षेत्रात आली नसती तर कोणत्या क्षेत्रात काम केले असतेस?

- मला हवाई सुंदरी बनायला आवडले असते. कारण मला प्रवास करायला खूप आवडतो. त्यामुळे माझी या क्षेत्राचीसुद्धा आवड आहे. मी जर कुठेच काम केले नसते तर मी लग्न केले असते आणि मी आज चार मुलांची आई असते.

: ‘सूर लागू दे’ हा चित्रपट कसा मिळाला?

- या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण बिर्जे यांचा मला एके दिवशी फोन आला. तेव्हा ते म्हणाले की, माझ्याकडे एका चित्रपटाची कहाणी आहे आणि त्यात पत्रकाराच्या भूमिकेचा समावेश आहे, तर त्या भूमिकेसाठी मला तूच योग्य वाटत आहेस. त्यावेळी मला असे वाटले की ती भूमिका साकारायला मला जमेल का? त्यानंतर मी या चित्रपटाची कथा वाचली, तेव्हा त्यात त्या पत्रकार महिलेच्या दोन बाजू होत्या, हे मी नोटीस केले. माझ्यावर या क्षेत्रातल्या मंडळींनी मी त्याच त्याच भूमिका करते, असा ठप्पा लावला होता. त्यामुळे मला तो माझ्यावरचा ठप्पा हटवायचा होता, म्हणून ही वेगळी भूमिका करायचा मी विचार केला.

: आजकाल सोशल मीडियाचे प्रस्थ वाढले आहे. काही कलाकार ट्रोलही होत आहेत, तर ट्रोलर्सचा सामना तू कसा करतेस?

- मी जास्त कोणाकडे लक्ष देत नाही. त्यांच्याकडे जितके दुर्लक्ष करता येईल तेवढे मी करत असते, पण कधी तरी वेळ आली तर मी इन्स्टाग्रामवर त्यांना सडेतोड उत्तरही देत असते आणि ट्रोलर्स लोकांचे हे कामच आहे की रोज कोणाला तरी ट्रोल करा. माझ्या कुटुंबाची आणि माझी या विषयावर बोलता बोलता कधी चर्चा झाली तर आम्ही सगळे खूप हसतो की कसे कसे लोक असतात या जगात. त्यामुळे हे लोक जेव्हा ट्रोल करतात तेव्हा त्यांचीच मानसिकता जगासमोर येते.

: या चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारताना काय शिकायला मिळाले? पत्रकारांविषयी तुझे मत काय?

- पत्रकारांना अनेक लढाया लढाव्या लागतात. त्यांना काही निर्णय असेही घ्यावे लागतात जे त्यांना मान्य नसतात. त्यांना घरच्यांना वेळ देता येत नाही. त्यांचा जास्त वेळ हा कामातच जातो. त्यांची दुसरी बाजू कोणी बघत नाही. त्यांनी काय बोलले आहे हे मात्र सगळ्यांच्या लक्षात राहते. त्यामुळे पत्रकारांवर सहज आरोप केले जातात. लोकांना हे समजत नाही की ते त्यांचे काम करत आहेत, पण मी जितके जवळून हे पाहिले आहे त्यावरून माझा सगळ्या पत्रकारांना सलाम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT