औरंगाबाद: घाटी रुग्णालयात कोविडने मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयातून मृतदेह मिळण्यास मोठा विलंब होत असल्याने नातेवाइकांचा रविवारी (ता. चार) संताप अनावर झाला. एकीकडे जिवलग सोडून गेला; पण दुसरीकडे मृत्यूनंतरही मृतदेह विलंबाने मिळत असल्याने सुपरस्पेशालिटी इमारतीसमोर नातेवाइकांनी रोष व्यक्त करीत गोंधळ घातला. यावेळी सुरक्षारक्षकालाही मारहाण झाली. हा प्रकार दुपारी बारानंतर घडला. पोलिसांना पाचारण करून त्यांनी व डॉक्टरांनी समजूत काढल्यानंतर नातेवाइकांचा रोष कमी झाला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुपर स्पेशालिटी इमारत, मेडीसीन इमारत, नेफ्रॉलॉजी विभाग व वॉर्ड क्रमांक ११ येथे कोविड रुग्ण उपचार घेतात. तेथे रुग्णांचे मृत्यू होतात. रविवारीही काही कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले. त्यानंतर बराच वेळ मृतदेह शवागारापर्यंत पोचले नाहीत. ‘सुपरस्पेशालिटी’ रुग्णालयातून मृतदेह बाहेर आणण्यासाठी मोठा वेळ लागत असल्याचे पाहून नातेवाइकांच्या संतापाचा अनावर झाला. त्यांनी तेथेच गोंधळ घालण्यास सुरवात केली.
यात काही सुरक्षारक्षकांना मारहाणही झाली. काहीवेळ तणावही होता. दरम्यान, परिस्थिती पाहून बेगमपूरा पोलिस व सुरक्षा रक्षकांना पाचारण करण्यात आले. डॉक्टर्स, पोलिसांनी रुग्णांच्या नातेवाइकांची समजूत काढली. तांत्रिक बाबी समजावून सांगितल्यानंतर तणाव निवळला. त्यानंतर वेगाने प्रक्रीया करून आठ ते दहा मृतदेह तेथून बाहेर काढले.
वाढत्या मृत्यूसंख्येमुळे होतो विलंब
घाटी रुग्णालयात अखेरच्या क्षणी भरती होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची मोठी संख्या आहे. त्यांच्याशिवाय गंभीर कोरोनाबाधित भरती होण्याचे प्रमाणही जास्त आहे. यातील काहींचे उपचारादरम्यान मृत्यू होतात. ही संख्या दररोज १८ ते २५ पर्यंत असते. मृत्यूच्या वाढत्या संख्येमुळे मृतदेह मिळण्यास विलंब होतो.
एकाच रुग्णवाहिकेवर भार
घाटी रुग्णालयात सुपर स्पेशालिटी इमारत, मेडीसीन इमारत, नेफ्रॉलॉजी विभाग व वॉर्ड क्रमांक ११ येथे उपचाराअंती कोविड रुग्णांचे मृत्यू होतात. चार ठिकाणे, सुमारे वीस मृत्यू आणि एकच रुग्णवाहिका! या स्थितीमुळे मृतदेह शवागारापर्यंत नेण्यास विलंब लागतो.
तांत्रिक फेऱ्यामुळे अंत्यसंस्कारालाही विलंब
कोविड रुग्णाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाला ‘रॅप’ करावे लागते. त्यासाठी वेगळी बॅग असते. त्यात मृतदेह निकषाप्रमाणे ठेवावा लागतो. कर्मचाऱ्यांना ‘पीपीई’ घालावी लागते. यात अर्धा ते पाऊण तास वेळ जातो. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून रुग्णवाहिकेत टाकून शवागारापर्यंत नेण्यात सव्वा तासापर्यंत वेळ जातो. या तांत्रिक बाबी आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारालाही विलंब लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.