छत्रपती संभाजीनगर येथे काल रात्री मोठा राडा झाला होता. संभाजीनगरमध्ये दोन गटाच्यां राड्यात अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तसेच दगडफेक देखील करण्यात आली. संतप्त जमावाने पोलिसांचे वाहनही जाळले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावाचे वातावरण आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात बुधवारी रात्री हाणामारीची घटना घडली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि सौम्य बळाचा वापर केला. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल ४०० ते ५०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिनसी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी १५ गाड्यांचे नुकासन केले आहे. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे, दंगा भडकवणे आदी कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तपास करण्यासाठी ८ पथके तयार करण्यात आले आहेत. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन -
दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीनगरमधील घटना दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी शांतता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र काही लोकांचा प्रयत्न आहे की भडकवणारे स्टेटमेंट देऊन परिस्थिती चिघळली पाहीजे. अशा नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजून घेण्याची गरज आहे. चुकीचे स्टेटमेंट देऊ नये सर्वांनी शांतता पाळावी. याला राजकीय रंग देण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्यापेक्षा दुर्दैवी काहीच नाही, असे फडणवीस म्हणाले.
आता संभाजीनगरमध्ये शांतता आहे. ही शांतता अशीच राहिली पाहिजे. काही नेते जाणीवपूर्वक राजकीय स्टेटमेंट देऊन परिस्थिती चिघळली पाहिजे म्हणून स्टेटमेंट देत आहेत. ते त्यांनी देऊ नये, असे फडणवीस म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.