औरंगाबाद: मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरु करणे शक्य नसल्याने ऑनलाईन अध्यापनासाठी शासनाने परवानगी दिली होती. आता कोरोनामुक्त असलेल्या गावात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत बुधवारी (ता. सात) सुधारीत शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यानुसार १५ जुलैपासून शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण १,३६८ गावांपैकी ९१९ गावे तूर्त कोरोनामुक्त झाली आहेत. या गावात शाळा सुरू करणे शक्य असल्याने स्थानिक प्रशासनाकडून हलचाली सुरु करण्यात आल्या आहेत.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. शिक्षण विभागाने विविध माध्यमातून प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. लॉकडाऊनमुळे शिक्षणात खंड पडल्यामुळे बालविवाह, बालमजुरी, मुला-मुलींच्या गळतीचे प्रमाण वाढले. मुलांचे आणखी शैक्षणिक नुकसान होवू नये, म्हणून शासनाने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग कोरोनामुक्त गावात सुरू करण्याचे जाहीर केले. जिल्ह्यातील १३६८ पैकी ९१९ गावे तूर्त कोरोनामुक्त झाली आहेत. त्यात पहिल्या लाटेत ४७५; तर दुसऱ्या लाटेत २२९ गावे कोविडमुक्त झाली. या गावांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागाकडून आढावा घेतला जात आहे.
गावपातळीवर समिती-
कोविडमुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करावा. ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या समितीने शाळा सुरु करण्याआधी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शिक्षकांचे लसीकरण करण्याबाबत पाठपुरावा करावा. तसेच विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करावी, तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार करावेत, अशा सूचना दिल्या आहेत.
शाळांसाठी मार्गदर्शक सूचना
- वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, डेस्क, टेबल, खुर्च्या, वाहने यांची वारंवार स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी शाळा प्रशासनाची असेल.
- संबंधित शाळेतील शिक्षकांनी गावातच राहावे किंवा येण्या-जाण्यासाठी स्वतःच्या वाहनाचा वापर करावा.
- रोज २ सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळेचे आणि त्यातील वर्गांचे स्वतंत्र आगमन आणि गमन यांचे वेळापत्रक व मार्ग शाळांनी निश्चित करावेत, म्हणजे गर्दी टळेल.
ही काळजी घ्यावी...
- एका बाकावर एक विद्यार्थी; २ बाकांमध्ये ६ फुटांचे अंतर
- एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी
- सत्रांच्या वेळा व महत्त्वाच्या विषयांचे आलटून पालटून नियोजन करणे
- सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर/रॅपिड अँटिजन चाचणी अनिवार्य
- विद्यार्थ्यांची उपस्थिती ऐच्छिक असून ती पूर्णतः पालकांच्या संमतीवर अवलंबून असेल
आकडे बोलतात...
जिल्ह्यातील एकूण गावे १३६८
कोरोनामुक्त गावे ९१९
जिल्ह्यातील एकूण शाळा ४३७६
जिल्हा परिषदेच्या शाळा २०७६
अनुदानित शाळा ८७८
विनाअनुदानित शाळा ३९४
स्वयंअर्थसाहय्य शाळा ः ८२२
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.