
आष्टी तालुक्यात जेमतेम पाऊस; पाच प्रकल्प कोरडेठाक
आष्टी (बीड): समाधानकारक पावसाअभावी तालुक्यातील पीकपाण्यावर पुन्हा संकट घोंगावत आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यातील पाच लघू तलाव कोरडेठाक पडले आहेत. तर एक मध्यम व पंधरा लघू असे सोळा तलाव जोत्याखाली आहेत. जेमतेम पाऊस झाल्याने पाणीसाठा अद्याप वाढलेला नाही. पावसाअभावी काही ठिकाणी पिके उगवली नाहीत, तर काही ठिकाणी उगवलेली पिकेही कोमेजू लागली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
कायम दुष्काळाचा सामना करणारा तालुका अशी आष्टी तालुक्याची ओळख आहे. सुदैवाने सलग दोन वर्षे तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले नाही. कोरोनाच्या काळात चारा-पाणीटंचाई न जाणवल्याने प्रशासनालाही दिलासा मिळाला. यंदा तालुक्यातील १ लाख २६ हजार ४२४ लागवडयोग्य क्षेत्रापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. अद्याप जेमतेम पाऊस झाला असला तरी बहुतांश भाग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाअभावी अनेकांची पिके उगवली नाहीत. अनेक ठिकाणी उगवलेली पिकेही कोमेजू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
दरम्यान, यंदा उन्हाळा संपेपर्यंत पाणीटंचाई जाणवली नाही व तालुक्यातील सहा मध्यम व २२ लघू तलावांमध्ये बरऱ्यापैकी पाणीसाठा होता. त्यामुळे पावसाळ्यात थोडा आधार मिळाल्यास तलाव भरण्यास मदत होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु रोहिणी नक्षत्रातील एक-दोन व मृग नक्षत्रातील एखादा अपवाद वगळता तालुक्यात सर्वदूर दमदार असा पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे गेल्या दीड महिन्याच्या काळात आहे तो साठाही कमी कमी होऊन तलावांची पाणीपातळी खाली गेली. पावसाळ्यामुळे उपयुक्त पाणीसाठाही कमी झाला. सध्या तालुक्यातील २२ पैकी १५ लघू पाटबंधारे तलाव जोत्याखाली आहेत, तर पाच तलाव कोरडेठाक आहेत.
याशिवाय सहा मध्यम प्रकल्पांमधील एक तलाव जोत्याखाली असून, इतर तलावांमध्येही अल्प पाणीसाठा आहे. येत्या कालावधीत दमदार पाऊस होईल, या आशेवर बळीराजा आहे. तर आष्टी शहर व परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या, रुटी इमनगाव मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. तर पाऊस नसल्याने आष्टीकरांची काळजी वाढली आहे. आष्टी व कर्जत (जि. नगर) हद्दीवर असलेल्या सीना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने हुलकावणी दिल्याने या धरणातही अवघा १३.५९ टक्के पाणीसाठा राहिला आहे. तालुक्यातील सर्व पाणीसाठे संपल्यावर हे धरणच आष्टी तालुक्याचा आधार ठरते.
मंडळनिहाय पाऊस
आष्टी १३४.६ मिमी, कडा ११२.६ मिमी, टाकळसिंग १०४.९ मिमी, दौलावडगाव ११६.६ मिमी, धामणगाव ९१.६ मिमी, धानोरा ८०.५ मिमी, पिंपळा १५३.१ मिमी.
मध्यम प्रकल्पातील साठा -
मेहकरी ५९१.८०० (२३.३२ टक्के)
कडा ६०१.४४ (९.८३ टक्के)
कडी ६१६.८६ (२२.१५ टक्के)
रुटी इमनगाव (जोत्याखाली)
तलवार ५६७.७१ (०.३१ टक्के)
कांबळी ६२३.२५ (६.८८ टक्के)
एकूण सरासरी पाणीसाठा १४.९९ टक्के
लघू प्रकल्पातील साठा
वेलतुरी ७२९.५० व केळ ७४२.०५ हे दोन तलाव वगळता तालुक्यातील पांढरी (लघू तलाव), ब्रह्मगाव, किन्ही, चोभानिमगाव वडगाव, बेलगाव, लोणी, पिंपळा, मातकुळी, सिदेवाडी, खुंटेफळ, कोयाळ, सुलेमान देवळा, धामणगाव व पांढरी (साठवण तलाव) हे पंधरा तलाव जोत्याखाली आहेत. तर पारगाव जोगेश्वरी (क्रमांक एक), पारगाव जोगेश्वरी (क्रमांक दोन), बळेवाडी, पिंपरी घुमरी, जळगाव हे पाच तलाव कोरडेठाक आहेत.