हिंगोली : रमाई आवास योजनेतर्गत २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षातील मंजूर झालेले व सध्यस्थितीत अपूर्ण असलेल्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण करुन शिल्लक हप्ते लाभार्थ्यांना वितरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
रमाई आवास योजनेसाठी निधीची चणचण असल्याने अडचण येत आहे. शिवाय चालू आर्थिक वर्षात तर अजूनही घरकुलांना मंजुरी दिलेली नाही. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, पारधी आवास योजना व शबरी आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो. परंतु गरीब, गरजू लाभार्थ्यांना योजनेंतर्गत हक्काचा निवारा देण्याचा प्रयत्न झाला असला तरी या योजनेमुळे लाभार्थी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे.
सद्यस्थितीत लाभार्थी घरकुलांचे बांधकाम करीत असताना उसनवारीचा आधार घेत आहेत. बांधकाम साहित्य विक्रेते उधारीने सामान देत नाहीत. रेती, विटा, सिमेंट आणि लोखंड खरेदी करताना नगदी व्यवहार करावा लागत आहे. एवढे करूनही अनुदान मिळण्यासाठी विलंब होत असल्याने लाभार्थ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकंदरीतच मनःस्ताप सहन करण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय लाभार्थ्यांसमोर सध्यातरी नाही. बहुसंख्य लाभार्थ्यांची अंतिम हप्त्याची अनुदान राशी थकीत आहे. त्यातच रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांनाही निधी नसल्याने मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात २०१६-१७ या वर्षात रमाई आवास योजनेत एक हजार ७९ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. त्यातील एक हजार ४५ लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला. एक हजार १० लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यात आला. तर ९५६ लाभार्थ्यांना तिसरा हप्ता मिळालेला आहे. मंजूर घरकुलांपैकी एक हजार एक घरे पूर्ण झाले आहेत. तर ७८ घरकुले अपूर्ण आहेत. २०१७-१८ या वर्षात एक हजार १८७ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. त्यातील एक हजार १०२ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला. एक हजार ३७ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता दिला. ९८६ लाभार्थ्यांना तिसरा तर ९०५ लाभार्थ्यांना चौथा हप्ता मिळाला आहे. या मंजूर घरकुलांपैकी ९८८ घरे पूर्ण झाले असून १९९ घरकुले अपूर्ण आहेत.
तालुकानिहाय मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांपैकी अनेक घरकुलांचे काम अजूनही अपूर्ण आहे. शिवाय अनेक लाभार्थ्यांना अद्यापही पूर्ण अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना घराचे बांधकाम करण्यास आर्थिक अडचणी येत आहेत. कोरोना आजारामुळे प्रत्येक विभागाचे अर्थचक्र थांबल्याने विभागांना निधी कमी वितरीत केला जात आहे. कोरोना आजाराचा फटका घरकुल योजनेलाही बसला आहे. यंदा तर नवीन घरकुलासाठी अद्याप कोणतीच हालचाल सुरू नाही. शिवाय गतवर्षीच्या घरकुलांचे देयके देण्यास अनुमती देण्यात आली नाही. त्यामुळे घराचे बांधकाम कसे करावे? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.