लातूर : वेगवेगळ्या पक्षात राहूनही जीवपाड मैत्री जपणाऱ्या तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील दो हंसो को जोडा म्हणून परिचित असलेल्या दिवगंत मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांची मैत्री पुतळ्याच्या रूपाने पुन्हा लोकांसमोर येणार आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात आता देशमुख यांच्या शेजारी मुंडे यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मंगळवारी (ता.१६) झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला.
दोघांनी ग्रामपंचायतीपासूनच राजकारणाला सुरवात केली. राजकारणापूर्वी महाविद्यालयीन जीवनापासून सुरू झालेली मैत्री शेवटपर्यंत जपली. विलासराव राज्याचे मुख्यमंत्री तर गोपीनाथराव राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. दिल्लीच्या राजकारणातही विलासरावानंतर गोपीनाथरावांनी ग्रामविकासमंत्री पद भुषवले. कोणी सत्तेत तर कोणी विरोधी पक्षात राहिले. मात्र, पक्षीय काम त्यांनी कधीच मैत्रीच्या आड येऊ दिले नाही. यामुळेच राजकारणातील देशमुख - मुंडे यांची मैत्री चांगलीच गाजली. दो हंसो का जोडा म्हणूनच दोघांच्या मैत्रीची ओळख होती. दोघांच्या निधनानंतरही या मैत्रीला विविध प्रसंगांतून उजाळा मिळत असतो.
आता जिल्हा परिषदेतून दोघांची मैत्री अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारी ठरणार आहे. यातूनच देशमुख यांच्या पुतळ्याशेजारी मुंडे यांचा पुतळा उभारून राजकारणातील मैत्रीचे धागे जपण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. मंगळवारी सर्वसाधारण सभेत माजी समाजकल्याण सभापती संजय दोरवे यांनी हा ठराव मांडला. या पुतळ्यासाठी साठ लाख रूपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगून हा पुतळा राजकारणातील कुटूता वाढू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसचे सदस्य नारायण लोखंडे यांनी हा ठराव उचित असल्याचे सांगून अनुमोदन देत दोघांच्या मैत्रीला उजाळा दिला. दोघांचे विचार नव्या पिढीला मार्गदर्शक असल्याचे डॉ. संतोष वाघमारे म्हणाले, तर हा ठराव उंचीचा असल्याचे रामचंद्र तिरूके यांनी सांगितले. माधव जाधव यांनीही ठरावाचे समर्थन करून दोघांचा पुतळा राजकीय कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्त्रोत होईल, असे सांगितले. यानंतर अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी हा ठराव मंजूर झाल्याचे जाहिर करताना मैत्रीचे हे पर्व पिढ्यान पिढ्या कायम राहिल, असे सांगितले.
मर्यादेपर्यंतच राजकारण होईल
राजकरणाच्या पुढे जाऊन बऱ्याच गोष्टी असतात. त्यातीलच एक असलेली मैत्री देशमुख व मुंडे यांनी आयुष्यभर जोपासली. पुतळ्याच्या ठरावावर चर्चा करताना अनेक सदस्यांनी हा मैत्रीचा धागा पकडून नव्या कार्यकर्त्यांतही विशिष्ट मर्यादेपर्यंतच राजकारण करण्याचा गुण जोपासण्यासाठी पुतळे प्रेरणादायी ठरतील. भिन्न पक्षातील कार्यकर्त्यांत टोकाचे राजकारण न करण्याचा विचार रूजला जाईल. पुतळ्यामुळे किमान जिल्हा परिषदेच्या कामकाजाला कधीच राजकारणाचा गंज चढणार नाही, अशी भावनाही सदस्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.