sakal
मराठवाडा

बीड: पुन्हा पावसाचा तडाखा, काढणीला आलेले सोयाबीनचे नुकसान

कपाशीही काळवंडली, मांजरा, माजलगाव धरणातून विसर्ग

सकाळ वृत्तसेवा

बीड : मागील १५ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे नदी, नाल्यांसह छोटीमोठी धरणे तुडुंब भरून वाहू लागली तर, शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. महसूल विभागामार्फत नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामेही अद्याप पूर्ण झाले नसताना गुरुवारी (ता. २३) मध्यरात्री पावसाने पुन्हा तडाखा दिला.

जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात वाहून गेले आहे तर, कापसाचे पीकही काळवंडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील मांजरा, माजलगाव धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

ऑगस्ट महिन्यात जवळपास महिनाभर दडी मारलेल्या पावसाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोसळायला सुरुवात केली आहे. ता. पाच ते आठ सप्टेंबर दरम्यान बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे नदी, नाले खळखळून वाहू लागले तर, बीड जिल्ह्यातील माजलगाव, मांजरा, बिंदुसरा यासारखी मोठी धरणे तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत.

या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मूग, कापूस, उडीद यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला दिले आहेत. प्रशासनाकडून पिकांच्या पंचनाम्याचे काम सुरु असून अद्यापपर्यंत जवळपास ६५ टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.

जवळपास अर्ध्या पिकांचे पंचनामे राहिलेले असताना गुरुवारी (ता. २३) मध्यरात्री जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पुन्हा मुसळधार पाऊस बरसला. यात अंबाजोगाई, केज, धारूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात वाहून गेले आहे.

अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात तळे साचल्याने सोयाबीन, कापूस, तूर यासारख्या पिकांचे पूर्णतः नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला असून हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. मांजरा धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आल्याने नदीला आलेल्या पुरामुळे धानोरा, तट बोरगाव, आपेगाव रस्ता बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

येथे झाली अतिवृष्टी

गुरुवारी रात्री जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, धारूर तालुक्यातील अनेक महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. अंबाजोगाई मंडळात ६१ मिलिमीटर, पाटोदा (म.) १४५.३ मिलिमीटर, लोखंडी सावरगाव ६८.३ मिलिमीटर, केज ९३ मिलिमीटर, युसुफ वडगाव ९६.८ मिलिमीटर, होळ ८७.५ मिलिमीटर, नांदूरघाट ७० मिलिमीटर, बनसारोळा ५९ मिलिमीटर, सिरसाळा ८७.३ मिलिमीटर, धारूर ६३ मिलिमीटर, मोहखेड मंडळात ७७.५ मिलिमीटर एवढा पाउस पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मांजरा, माजलगाव धरणाचे दरवाजे उघडले

बीड जिल्ह्यातील मांजरा, माजलगाव या दोन मोठ्या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात गुरुवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला आहे. मांजरा धरणाचे सहा तर, माजलगाव धरणाचे नऊ दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Electricity: राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज; १०० युनिटपर्यंत दिलासा, स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

Sourav Ganguly Video : महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नाही! सौरव गांगुलीचा जुना व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय म्हणाला होता? ऐका...

Nagpur News: बहिणीच्या मूळ पेशींमुळे चिमुकलीला मिळाले जीवनदान; रक्ताच्या कर्करोगावर बोनमॅरो ट्रान्सप्लांट ठरले यशस्वी

Success Story: एकाच वेळी मामा भाचे झाले क्लासवन अधिकारी; एमपीएससी परीक्षेत शिर्ल्याच्या मामा भाच्यांची दमदार कामगिरी

Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात चौथ्या वाघावर शिक्कामोर्तब, कुंभार्ली घाटात वाघाचे दर्शन

SCROLL FOR NEXT