जालना - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कष्ट घेत आहे. ग्रामीण भागात ग्रामसेवक, तलाठी, आशा, अंगणवाडी सेविकाही जनजागृती करीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना धैर्य मिळत असल्याचे चित्र आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी शेकडो नागरिक विविध शहरांतून गावांकडे परतले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी सर्व ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले आहेत. आदेशानुसार ग्रामसेवक आपले घर सोडून गावात राहत आहेत. बाहेरून आलेल्या व्यक्तींवर नजर ठेवण्याबरोबरच गावात निर्जंतुकीकरण फवारणी, स्वच्छता, पाणी शुद्धीकरण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून आलेल्या व्यक्तींचे सर्वेक्षण, गावात झालेल्या मृत्यूची पाहणी आदी कामे ग्रामसेवक करीत आहेत.
कोरोना व्हायरसपासून संरक्षणासाठी दवंडी, बॅनर, लाऊडस्पीकर, हँडबिल व प्रत्यक्ष घरोघरी जाऊन जनजागृती करून ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ग्रामसेवक संवर्गाप्रमाणेच आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचारी या कामात मदत करीत आहेत.
क्कादायक: कामगारांना केमिकलयुक्त पाण्याने घातली आंघोळ; योगी सरकारवर टीकेचा भडीमार!
अफवांचे पेव काही थांबेना
जिल्ह्यातील प्रत्येक गावात रोज भीती निर्माण करणाऱ्या अफवा पसरत आहेत. एखाद्या गावात बाहेरील जिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी घेऊन गेल्यावर लोक अधिकच भयभीत होत आहेत. आशा काळात ग्रामसेवक ग्रामस्थांना समजावून सांगून धीर देत आहेत; तसेच सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता असे संदेश पुढे न पाठविण्याचे आवाहनही युवकांना करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूबाबत गावात अनेक गैरसमज पसरले होते. ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकांनी केलेल्या जनजागृती व उपाययोजनांमुळे ग्रामस्थांमधील भीती दूर झाली आहे. लोक आपली काळजी घेत आहेत.
- कालिंदा ढगे, सरपंच, सिरसवाडी
जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नसताना रुग्ण सापडल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे सगळेच घाबरले होते; मात्र ग्रामसेवक, आशा वर्कर यांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली. काळजी घेण्याबाबत माहिती दिल्याने लोक आता अफवांवर विश्वास ठेवत नाहीत.
- सचिन मोरे, सरपंच, गोलापांगरी
बेघरांना अन्नदान करण्यासाठी सरसावले युवक
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक बेघरांच्या दोनवेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो सोडविण्यासाठी शहरातील युवक सरसावले असून, त्यांना नियमित भोजन पुरविण्याची व्यवस्था हे युवक करीत आहेत. जालना शहरातील रेल्वे, बसस्थानक परिसरात अनेक बेघर नागरिक रस्त्यांवर वास्तव्य करतात; तसेच लॉकडाऊनमुळे बाहेरील जिल्ह्यांतील अनेक मजूर कुटुंबे शहरात अडकून पडलेली आहेत. या संकटाच्या काळात त्यांनी उपाशी राहून नये म्हणून अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना दोन वेळचे अन्न पुरवठा करण्याची जबाबदारी शहरातील युवकांनी घेतली आहे. त्यांना नियमित अन्न व पाणी पोच करून हे युवक सामाजिक बांधिलकी पार पाडत आहेत. या उपक्रमासाठी नीलेश गोर्डे, साहील पाटील, संदीप सुखधाने, किशोर मगर आदी पुढाकार घेत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.