घनसावंगी (जि.जालना) - तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या शवविच्छेदनगृहाचे हाल झालेले आहेत. रंग उडालेल्या इमारती, दारे-खिडक्या गायब, काटेरी झाडाझुडुपांचा विळखा असा हॉरर सीन शवविच्छेदनगृहाभोवती दिसत आहे. आरोग्य विभागाने याबाबत लक्ष देण्याची गरज आहे.
हेही वाचा : बदनापूर ग्रामीण रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शवविच्छेदनगृहाची अवस्था भयपटाप्रमाणे झालेली आहे. रांजणीत नुकतीच इमारतीला रंगरंगोटी झाली, अन्य ठिकाणी मात्र स्थिती भयंकर आहे. कुंभार पिंपळगाव येथे शवविच्छेदन रूमला तर दरवाजा नाही, येथे दिवसभर कुत्र्यांचा वावर असतो. या रूमच्या अवतीभोवती गवताने वेढले आहे. राजाटाकळी येथील शवविच्छेदन रूमसह सर्वच रुग्णालयाला काटेरी झाडझुडुपांनी वेढले आहे. राणीउंचेगाव येथील इमारत जुनीच आहे. तीर्थपुरी येथे जाण्यासाठी रस्ताच नाही, पावसाळ्यात मोठी गैरसोय होते.
हेही वाचा : भोकरदनला उपजिल्हा रुग्णालयाची आस
तालुक्यातील आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करण्याची सुविधा नाही. शवविच्छेदनगृहाच्या खोल्यांमध्ये प्रकाशव्यवस्थेचा अभाव आहे. रांजणी, कुंभार पिंपळगाव, तीर्थपुरी येथील आरोग्य केंद्रांत अनेकदा पीएम किटही उपलब्ध नसते. अशावेळी मृताच्या नातेवाइकांना उत्तरीय तपासणीसाठी लागणारे साहित्य बाहेरून आणावे लागते. आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णालयातही कोल्ड बॉक्सची व्यवस्था नाही, परिणामी मृतदेह ठेवणेही अडचणीचे ठरते.
शवविच्छेदन करण्यासाठी फॉरेन्सिक मेडिसन सर्जन जिल्हास्तरावरील रुग्णालयात आहे. तालुकास्तरावर हे डॉक्टर्स नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फतच शवविच्छेदन करण्यात येते. एक शवविच्छेदन एक ते दीड तासात करण्यात येते. तालुक्यात ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिनाभरात एकूण तीस ते चाळीस शवविच्छेदन केले जातात.
घनसावंगी येथे ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मितीबरोबर 17 लाख रुपयांच्या निधीतून शवविच्छेदनगृहाची खोल्यांची निर्मिती करण्यात आली. त्यात शवविच्छेदन कक्ष, व्हिसेरा राखून ठेवण्यासाठी कक्ष, डॉक्टर्स चेंजिंग रूम, शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रूम, अनोळखी मृतदेह ठेवण्यासाठी कोल्ड बॉक्स अशा स्वरूपात व्यवस्था आहे. शिवाय ग्रामीण रुग्णालयात 24 तास वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असतात. त्यामुळे अनेकदा आरोग्य केंद्रांत डॉक्टर उपलब्ध न झाल्यास उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणला जातो. परिणामी ग्रामीण रुग्णालयावर अधिक भार पडतो.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा, प्रतिनियुक्त्यांचा घोळ, डॉक्टर बाहेरगावी जाणे, गैरहजर असणे, सहायक कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा अशा अनेक कारणांमुळे उत्तरीय तपासणीची कामे खोळंबतात. त्यात आरोग्य केंद्रात शवविच्छेदन होत नसेल तर अनेकांना घनसावंगी येथे यावे लागते. विशेष म्हणजे तालुक्यात एकही शववाहिका नसल्याने टेंपो, मिनी टेंपो, जीपगाड्यांसह इतर खासगी वाहनांचा वापर करावा लागतो, खासगी गाड्यांतून मृतदेह घनसावंगीत आणावा लागतो.
तालुकापातळीवर फॉरेन्सिक तज्ज्ञ, कोल्ड बॉक्स असणे गरजेचे आहे. वैद्यकीय अधिकारी, शवविच्छेदन कक्षातील कर्मचारीही उपलब्ध होणे आवश्यक आहे. व्हिसेरा पोलिसांनी तत्काळ प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेला पाहिजे. शवविच्छेदनगृहाचा परिसर स्वच्छ राहिला पाहिजे. ग्रामीणस्तरावर संबंधित यंत्रणेने इमारती व कायम वीजपुरवठा, साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे.
- डॉ. गणेश राठोड,
वैद्यकीय अधिकारी, घनसावंगी
शवविच्छेदनासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वेळेवर उपलब्ध होत नाहीत. परिणामी उशीर होतो. रात्री शवविच्छेदन करण्यात येत नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशीपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. यात मृताच्या नातेवाइकांची मोठी हेळसांड होते. आरोग्य केंद्रांअंतर्गत अद्ययावत शवविच्छेदनगृह असणे ही काळाची गरज आहे.
- श्रीमंत साळवे,
ग्रामस्थ, मोहपुरी
जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांच्या शवविच्छेदनगृहाच्या दुरुस्तीसह तेथील सुविधांबाबत प्रशासनाकडे मागणी करण्यात येईल. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विकास निधीबरोबर जिल्हा परिषदेच्या निधीतून तरतूद करावी, याबाबत पाठपुरावा करणार आहे.
- पूजा कल्याण सपाटे,
सभापती, जिल्हा परिषद, जालना
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.