हिंगोली : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ( ता. १९) भल्या पहाटेपासून हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा व सेनगाव तालुक्यात पावसाची रिमझिम सुरु होती. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत पाऊस कायम होता. ढगाळ वातावरणामुळे पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. यामुळे गहू, हरभरा, ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्याप्रमाणे जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यात गुरुवारी व शुक्रवार असा सलग दोन दिवस मेघगर्जनेसह पाऊस झाला.
शुक्रवारी सकाळी भल्या पहाटेपासुन साडेदहा वाजेपर्यंत पावसाची रिमझिम कायम सुरू होती. यामुळे जिल्ह्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. थंडगार हवेमुळे गारवा निर्माण झाला आहे. यामुळे गहु, हरभरा, ज्वारी पिकांना फटका बसला आहे. सध्या अनेक भागात हरभरा पिकांची काढणी सुरु असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या काढणीस आलेल्या हरभरा पिकांचे नुकसान होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पावसाने उभे गव्हाचे पिक देखील आडवे पडले आहे. खरीपाच्या पिकाबरोबर रब्बीच्या पिकाला देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात मागच्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. बुधवारी जिल्ह्यात हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा तालुक्यात पाऊस झाला तर शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस झाला. शुक्रवारी सुरु असलेल्या रिमझिम पावसाने पावसाळी वातावरण निर्माण झाले घराबाहेर कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांनी छत्री तर दुचाकीवर जाणाऱ्यानी रेनकोटचा वापर केला. खरीपाच्या पिकात सोयाबीन, तुर, कापूस पिकांचे झालेले नुकसान रब्बीच्या पिकांत भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र अवकाळी पावसाचा फटका बसल्याने त्याचा पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा गहू, हरभरा, ज्वारी या पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
संपादन- प्रल्हाद कांबळे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.