लातूर : गेल्या ४० वर्षांपासून मी कवितेच्या प्रांतात आहे. मी कविता नुसती लिहित नाही, ती जगतो. त्यामुळे माझे जगणे आणि लिहिणे हे एकच आहे. जगण्याचे प्रतिबिंब माझ्या कवितेत उतरत असते. त्याची दखल घेत केशवसूत यांच्या नावाचा अत्यंत मानाचा पुरस्कार सरकारने दिल्याने माझे बळ आणखी वाढले आहे, अशी भावना कवी शशिकांत हिंगोणेकर यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.
उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी राज्य सरकारच्या वतीने यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार दिले जातात. या अंतर्गत यंदा राज्यातील सुमारे 35 लेखक-कवींना वेगवेगळ्या लेखकांच्या नावांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात हिंगोणेकर यांना कवी केशवसुत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्यासह मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिन भूषण गगराणी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर, स्वायत्त मराठी विद्यापीठाचे विश्वस्त श्याम जोशी, उषा हिंगोणेकर उपस्थित होत्या. हा सोहळा मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने मुंबईत बुधवारी (ता. २७) झाला. एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
हिंगोणेकर यांच्या ऋतूपर्व या काव्यसंग्रहाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. या काव्यसंग्रहाबद्दल ते म्हणाले, ‘‘हा काव्यसंग्रह २०१७ मध्ये प्रकाशित झाला. जवळपास ८५ कवितांचा त्यात समावेश केला आहे. खरंतर हा नुसता काव्यसंग्रह नाही. ही जीवनानूभवाची मालिका आहे. माझ्या सभोवतालचे जे अस्वस्थ करणारे वातावरण आहे, ते या संग्रहाच्या पानापानांत वाचायला मिळेल. वास्तविक, हे माझे अनुभव आहेत; पण वाचकांना ते आपले वाटत आहेत. यात कविचे खरे यश असते.’’
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.