मुंबई

आता लढाई साथीच्या आजारांशी

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : अतिवृष्टीनंतर पावसाने काहीशी उसंत घेतली असली, तरी शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने नागरिकांची आता आजारांशी लढाई सुरू झाली आहे. पालिकेची रुग्णालये व दवाखाने रुग्णांनी हाऊसफुल्ल झाले आहेत.

दूषित पाणी आणि डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डेंगी, लेप्टो व मलेरियासह काविळीच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिवा परिसरात तर तापसरीने पाच जणांचे बळी घेतले आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचा आरोग्य विभागदेखील सतर्क झाला आहे. शहरात युद्धपातळीवर औषध आणि धूरफवारणी सुरु केली आहे. 
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती.

याशिवाय अनेक भागांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडील गेल्या काही महिन्यातील जलजन्य व कीटकजन्य आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. किंबहुना, ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील दवाखाने आणि रुग्णालयात हीच परिस्थिती आहे. पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे.

शहरामध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर साथीचे आजार उद्‌भवू नयेत यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्येक प्रभाग समितीअंतर्गत तातडीने लक्ष घालण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

दरम्यान, पावसाळ्याच्या दिवसात ताप आल्यास लगेचच नजीकच्या महापालिकेच्या रुग्णालयात, आरोग्य केंद्रात जाऊन रक्ताची तपासणी करावी; तसेच स्वतःच्या घरातील अगर आजूबाजूची व्यक्ती हिवताप, डेंगी फिव्हर, कावीळ, हगवण, विषमज्वर (टायफॉईड), लेप्टोस्पायरोसिस इ. साथीच्या रोगांनी आजारी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती त्वरित नजीकच्या महापालिकेच्या दवाखान्यात अथवा आरोग्य विभाग मुख्य कार्यालयात देऊन वेळीच उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 


लेप्टोस्पायरोसिस या साथीबाबत प्रतिबंधात्मक गृहीत उपचारातंर्गत जे नागरिक जास्त वेळ पाण्यात होते, त्यांना डॉक्‍सीसायक्‍लीन गोळ्या देण्यात येत असून तापाची लक्षणे आढळून आलेल्या काही नागरिकांचे मलेरियासाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. ज्या ठिकाणाहून दूषित पाण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, त्या ठिकाणच्या नळसंयोजनांची तपासणी करून आवश्‍यक ती कारवाई करण्याच्या सूचनाही पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 
- डॉ. हरिदास गुजर, मुख्य आरोग्य अधिकारी, ठाणे महानगरपालिका 


साथीचे आजार बळावू नयेत यासाठी महापालिकेचा फायलेरिया विभागदेखील सज्ज झाला असून या विभागाचे 8 स्वच्छता निरीक्षक, 30 सुपरवायझर, 100 कर्मचाऱ्यांसह शेकडो कंत्राटी कामगारांमार्फत टेमीफॉस (हॅबिट) औषध व धूरफवारणी करण्यात येत आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी पाणी साचले होते, त्या सर्व ठिकाणी; तसेच कचरा आणि गाळ असलेली ठिकाणे सफाई करून तेथेदेखील औषधफवारणी करून रोगप्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे. 
- राजेश चौधरी, स्वच्छता निरीक्षक, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT