डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत स्टेशन परिसरात नव्याने उड्डाणपूल उभारणीचे काम सुरु आहे. नव्याने उड्डाणपूल उभारण्यात येत असतानाच काही वर्षांपूर्वी उभारलेल्या जुन्या उड्डाणपुलाची स्वच्छता व देखभालीकडे प्रशासन कानाडोळा करीत आहे.
कल्याण पश्चिमेकडील स्कायवॉक हा प्रवाशांसाठी कमी फेरीवाल्यांसाठी जणू उभारण्यात आला आहे का ? असा प्रश्न येथील फेरिवाले पाहून पडतो. हे फेरिवाले त्यांच्याकडे जमा होणारा कचरा स्कायवॉक परिसरातच टाकत असल्याने सध्या येथे कचऱ्याचे ढिग जमा झाले आहेत.
या कचऱ्याच्या ढिगाचा आणि दुर्गंधीचा सामना स्कायवॉकवरुन ये जा करणाऱ्या प्रवाशांना करावा लागत आहे. नविन उड्डाणपूल उभारणी होईल तेव्हा होईल परंतु सद्य स्थितीत जे स्कायवॉक आहेत त्यांची किमान स्वच्छता राखण्यात यावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.
कल्याण स्टेशन परिसरातील प्रवाशांची फेरिवाले आणि वाहन कोंडीतून सुटका व्हावी यासाठी 2010 - 11 साली एमएमआरडीएच्या माध्यमातून स्कायवॉक बांधण्यात आला होता. आता स्मार्ट सिटी अंतर्गत हा स्कायवॉक काढून तेथे नव्याने उड्डाणपूल उभारला जात आहे.
अनेक ठिकाणची स्कायवॉक चा ढाचा काढण्यात आला आहे. रेल्वे स्थानकाला लागून दिपक हॉटेल पर्यंत असलेला ढाचा अद्यापही तसाच असून या स्कायवॉकचा वापर मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी करतात.
फेरिवाल्यांचे देखील या स्कायवॉकवर मोठ्या प्रमाणात बस्तान सुरुवातीपासून राहीले आहे. छोटे मोठे विक्रेते, भाजी विक्रेते येथे आपला व्यवसाय करण्यास बसतात. त्यांच्याकडे जमा होणारा कचरा ते रात्रीच्या वेळेस स्कायवॉक परिसरातच जमा करुन जातात.
स्कायवॉकची दररोज स्वच्छता पालिका प्रशासनाकडून केली जात नसल्याने हा दिवसेंदिवस कचरा साचून त्याचे ढिग जमा झाले आहेत. कचरा कुजून त्याला दुर्गंधी सुटल्याने या परिसरातून ये जा करणे प्रवाशांना नकोसे होते.
नाक मुठीत घेऊनच त्यांना आपला प्रवास करावा लागतो. स्कायवॉकवर साचलेल्या कचऱ्याला आग लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यानंतर पालिकेने एकदा स्कायवॉकवरील कचरा गोळा केला असता ट्रकभर कचरा जमा झाल्याचे पहायला मिळाले होते.
स्कायवॉकची देखभाल दुरुस्ती एमएमआरडीएकडे होती तोपर्यंत तो सुस्थितीत होता. परंतू पालिका प्रशासनाकडे याची जबाबदारी आल्यानंतर स्कायवॉकची दुरावस्था झाल्याचे पहायला मिळाले आहे. स्कायवॉकवर गर्दुल्ले, भिकारी यांचे बस्तान असून रात्रीच्या वेळेस महिलांसाठी यावरील प्रवास धोकादायक आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत नव्याने उड्डाणपूलाची उभारणी केली जात आहे. मात्र सद्य परिस्थितीत दिपक हॉटेलपर्यंत असलेला उड्डाणपूल हा प्रवाशांसाठी फायदेशीर असून त्याचा वापर प्रवासी करतात. नवीन उड्डाणपूल उभा राहील तेव्हा राहील तोपर्यंत आहे त्या पूलाची स्वच्छता देखभाल दुरुस्ती करणे पालिका प्रशासनाचे काम आहे. परंतू ते पालिका प्रशासनाकडून केले जात नाही. यामुळे आज अनेक ठिकाणी स्कायवॉकवर घाणीचे साम्राज्य दिसून येते. पालिकेने याकडे गांर्भियाने पहावे असे वाटते.
सुनिल धमाले, जागरुक नागरीक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.