मुंबई ः मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार तलावाची दुरुस्ती आणि सुरक्षिततेचे काम लवकरच केले जाणार आहे. मातीच्या बंधाऱ्याच्या दगडी पिंचिंगची दुरुस्ती, तलावाभोवती सुरक्षिततेसाठी कुंपण, टेहळणीसाठी मनोऱ्याचे बांधकाम आदी कामे करण्यात येणार आहेत. सर्व कामांसाठी सुमारे 26 कोटी रुपये पालिका खर्च करणार आहे.
मुंबईजवळ असणाऱ्या विहार तलावातून मुंबईला दररोज 90 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तलावाचे पाणलोट क्षेत्र 18.96 चौरस किलोमीटर आहे; तर त्याची साठवण क्षमता 41 दशलक्ष लिटर इतकी आहे. हा तलाव पवई, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आयआयटी संस्था व भांडुप जलशुद्धीकरण संकुल यांनी वेढलेला आहे. या तलावातील पाणी गाळणी संयंत्रामधून शुद्ध करून पवई जलाशयात पाठवण्यात येते.
राज्य सरकारच्या धरण सुरक्षा समितीने विहार धरणाची पाहणी करून काही महत्त्वाची दुरुस्ती कामे आणि उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार विहार तलावाच्या मातीच्या बंधाऱ्यावरील उतारावरील दगडी पिंचिंगची दुरुस्ती, सांडव्याच्या उताराची आवश्यक दुरुस्ती आणि खालील बाजूचा जीर्ण व झीज झालेला पृष्ठभाग भेगा पडून खचला असल्याने त्याची सिमेंट-काँक्रीटच्या साह्याने दुरुस्ती व पुनर्बांधणी करून क्रिस्टलाईन ग्राऊंटिंग केले जाणार आहे. दर्गा धरण आणि विहार पंपिंग धरण यांच्या दोन्ही बाजूंकडील दगडी पिंचिंगची आवश्यक दुरुस्तीही केली जाणार आहे.
सुरक्षिततेसाठी टेहळणी मनोरे
तलावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन ठिकाणी टेहळणी मनोरे, समाजकंटकांची घुसखोरी रोखण्यासाठी तलावाभोवती संरक्षक भिंत व लोखंडी जाळी बसवण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. विहार तलाव आणि धरण परिसरात नैसर्गिक सौंदर्य जतन करण्यासाठी सजावट स्वरूपाची लोखंडी जाळी व बोट उभी करण्यासाठी धक्काही बांधला जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या सभागृहात लवकरच मंजुरीसाठी येणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.