Police arrested the accused within 24 hours for throwing paint on Meenatai Thakre’s statue, who later confessed to the crime.
esakal
Police arrested the accused for throwing paint on Meenatai Thackeray statue : मुंबईमधील दादर शिवाजी पार्कातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकून विटंबणा करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने गुन्हा कबूल केला असून, त्याची ओळखही आता समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार हे कृत्य करणाऱ्या आरोपीचे नाव उपेंद्र गुणाजी पावसकर असं आहे. तर तो ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याचीही माहिती समोर आली आहे.
तर आरोपीला पोलिसांनी पकडताच त्याने गुन्हाही कबूल केला आहे. यानंतर आरोपी उपेंद्रने आपल्या कृत्याबाबत धक्कादायक खुलासा देखील केला आहे. संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा खळबळजनक आरोप या आरोपीकडून करण्यात आला आहे. दादर पोलिस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी हा आरोपी सातत्याने यायचा अशीही माहिती समोर येत आहे. आता आरोपी पकडल्यानंतर याप्रकरणाचा पोलिस अधिक सखोल तपास करत आहेत.
दरम्यान आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. शिवाय, अनेक नेते, पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनी पुतळ्याच्या ठिकाणी गर्दीही केली होती. दरम्यान, आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुतळ्याची पाहणी करत, पोलिसांना २४ तासांच्या आत आरोपीला पकडावे अशी मागणी केली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील स्वत: पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन, बारकाईन पाहणी केली आणि पुष्प अर्पण करून अभिवादन केलं होतं.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते? -
पुतळ्याची पाहणी केल्यानंतर घडल्या प्रकाराबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, ‘’आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे. एकतर यामागे अशी व्यक्ती अशू शकते की ज्याला स्वत:च्या आई-वडिलांचं नाव घेण्यास लाज वाटते. अशा कुणीतरी लावारीस माणसाने हे केलं असेल. नाहीतर बिहारमध्ये ज्याप्रकारे मोदींच्या मातोश्रींचा अपमान झाला. म्हणून बिहार बंद करण्याचा जो एक अयशस्वी प्रयत्न केला गेला. असा कुणाचा तरी महाराष्ट्र पेटवण्यासाठीचा हा उद्योग असू शकेल. तूर्त पोलीस या सगळ्या गोष्टींचा शोध घेत आहेत. आम्ही सर्वांना शांत राहण्यास सांगितलं आहे, बघूयात पुढे काय होतं.’’
तसेच, ‘’मी पुन्हा एकदा सांगतो दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती यामध्ये अशू शकतात, की ज्यांना स्वत:च्या आई-वडिलांचं नाव घेण्यास लाज वाटते, अशा कुणीतरी बेवावरस व्यक्तीने हे केलं असेल किंवा बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदींच्या मातोश्रींचा अपमान केला गेला, ते निमित्त करून जसा बिहार बंद करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा आजचा हा प्रयत्न असू शकतो.’’ असं यावेळी उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं होतं.