ठाणे : आई-वडिलांचे छत्र हरपले म्हणून कर्नाटकातील १३ वर्षांची मुस्कान आणि १४ वर्षांची कोमल (नावे बदलली आहेत) भावाकडे राहण्यासाठी कल्याणला आल्या; पण त्यांच्यासमोरच्या अडचणी वाढतच गेल्या. घरातील जाचाला कंटाळून त्या घरातून पळाल्या. पोलिसांना त्या कल्याण रेल्वेस्थानकावर आढळल्या. बाल संरक्षण विभागाने (चाइल्ड प्रोटेक्शन युनिट) त्यांना विश्वासात घेत त्यांची माहिती घेतली. मुलींच्या पालकांशी संपर्क साधला अन् त्यांना कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ आणि ‘ऑपरेशन मुस्कान’मुळे सात वर्षांत घर सोडून वाट चुकलेल्या ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील सुमारे एक हजार ८८४ मुला-मुलींना पुन्हा मायेची ऊब मिळाली आहे.
बेपत्ता मुला-मुलींची संख्या लक्षणीय आहे. घरी जायचे नसते किंवा परतीचा मार्ग माहीत नसल्याने अशी मुळे एक तर गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात किंवा कुठल्या तरी टोळीच्या सापळ्यात अडकतात. गुन्हेगारी टोळी त्यांना भीक मागण्याच्या कामात जुंपतात. अशा प्रवृत्तीला लगाम घालण्यासाठी चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ची स्थापना करण्यात आली. ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट आणि मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाने केलेल्या धडक कारवाईने अनेक वाट चुकलेल्या मुलांना योग्य दिशा मिळाली.
पोलिसांच्या ‘ऑपरेशन मुस्कान’अंतर्गत सात वर्षांत अशा मुलांना स्वगृही पोहचवण्यात यश आले आहे. ठाणे पोलिसांच्या विशेष पथकांनी २०१४ ते २०१६ पर्यंत एक हजार ३६ मुलांना पुन्हा कुटुंबाचा आधार मिळवून देत त्यांच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’ फुलविले आहे. २०१७ मध्ये २४८ मुलांना पुन्हा कुटुंबापर्यंत पोहचवण्यात यश मिळवले. कोरोना काळात दीड ते दोन वर्षे मोहीम बंद होती. मात्र, २०१७ ते आतापर्यंत सुमारे ६०० मुलांना शोधून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
मुलींना शोधण्यास प्राधान्य
घर सोडून जाण्यामध्ये मुलींची संख्याही चिंताजनक आहे. कधी फूस लावून; तर कधी प्रेमाच्या भूलथापा देत त्यांचे अपहरण केले जाते. त्यानंतर त्यांची रवानगी एखाद्या कुंटणखान्यात होते. अशी अनेक उदाहरणे आहेत. म्हणूनच मुलींच्या शोधकार्याला प्राधान्य दिले जाते.
शोध घेण्यात आलेली मुले
२०१४ ते २०१६ : १,०३६
२०१७ : २४८
२०१७ ते २०२२ : ६००
‘ऑपरेशन मुस्कान’
१८ वर्षांखालील हरवलेल्या मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबांच्या ताब्यात देण्यासाठी २०१५ मध्ये ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहीम सुरू करण्यात आली. सर्वप्रथम झारखंड पोलिसांनी अशी मोहीम सुरू केली. मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने सर्व राज्यांतील पोलिसांनी ती स्वीकारली.
या मोहिमेसाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष पोलिस पथक तयार करण्यात आले आहे. रेल्वेस्थानके, बस आगार, रस्ते, वाहतूक सिग्नल, धार्मिक स्थळे व अन्य खुल्या ठिकाणी राहणाऱ्या मुलांचा शोध पथकाद्वारे घेतला जातो. भिक्षेकरी गृह, अनाथाश्रम इत्यादी ठिकाणीही पथके कार्यरत असतात.
‘ऑपरेशन मुस्कान’मुळे राज्यभरात सात वर्षांत घर सोडून वाट चुकलेल्या सुमारे ३७ हजार ५११ मुला-मुलींना त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात यश आले आहे. अशा मुलांना शोधून बालगुन्हेगारी कमी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. त्यात देशभरात महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचा पहिला क्रमांक लागतो.
आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील दोन हजार ३६३ मुलांचा शोध घेण्यात यश आले आहे. अशा मुलांना विश्वासात घेऊन समजवावे लागते. त्यांचे ‘एनजीओ’मार्फत समुपदेशन केले जाते. पालक मुलांचे संगोपन करण्यास समर्थ आहेत की नाही, याचा आढावा घेऊनच त्यांना त्यांच्या स्वाधीन केले जाते.
- एस. एस. खाडे, पोलिस उपनिरीक्षक, बाल संरक्षण विभाग, ठाणे
मुलांना विश्वासात घेण्याची गरज आहे. त्यांना त्रास होईल, अशा गोष्टी टाळाव्यात. त्याचे सकारात्मक परिणाम होऊन घरातून बाहेर पडण्याच्या विचारापासून ती परावृत्त होऊ शकतात.
- शैलेश उमाटे, मानसोपचारतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.