ठाणे - शासनाचा प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या धोरणात विरोधात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी शासनाविरोधात असहकाराची हाक दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक २५ सप्टेंबरला सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे या दिवशी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा बंद राहणार आहेत.
शिक्षकांनी शासनाच्या विद्यार्थी विरोधी धोरण विरुद्ध असहकार आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन तीन टप्प्यात होत असून पहिल्या टप्प्यात १९ सप्टेंबरपासून शिक्षक शाळांवर काळ्या फिती लावून काम करीत आहेत. दुसऱ्या टप्प्यात २० सप्टेंबरला रात्री आठ वाजता जिल्ह्यातील सर्व शिक्षक एकाच वेळी प्रशासनाच्या व्हाट्सअप ग्रुप मधून बाहेर झाले आहेत.
त्यामुळे प्रशासनाची शाळां सोबत ची माहिती देवाण-घेवाण ठप्प झाली आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे येत्या २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शिक्षक एकाच वेळी सामूहिक रजा येणार असून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत.
१५ मार्च चा शिक्षक संच मान्यता व ५ सप्टेंबर च्या कंत्राटीत शिक्षक भरतीचा शासन निर्णयामुळे वीस पटाच्या शाळेमध्ये एक कायम तर एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे. आधार वर संचमान्यता होत असल्याने दुर्गम भागात विद्यार्थी अधिक परंतु आधार नोंदणी नसल्याने अनेक शिक्षकांची पदे कमी होणार आहे.
शासनाचे हे धोरण डोंगरी दुर्गम भागातील तसेच वाडी- वस्तीवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहेत. शासनाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थी, शिक्षक पालकांमध्ये असंतोष आहे. या धोरणांचा विरोध करण्यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी त्रिस्तरीय असहकार आंदोलन पुकारले आहे.
काय आहेत मागण्या
१५ मार्च, ५ सप्टेंबर चे शासन निर्णय रद्द करणे.
विद्यार्थी आधार कार्ड आधारित संचमान्यता धोरण रद्द करणे.
विद्यार्थी गणवेश अविलंब मिळावेत.
पाठ्यपुस्तके तातडीने पुरवावीत व पाठ्यपुस्तकांना कोरी पाने न देता स्वतंत्र स्वाध्याय पुस्तिका द्याव्यात.
शैक्षणिक-अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात दुरुस्ती करणे.
जि. प.शिक्षकांना मुख्यालयी निवासाची सक्ती रद्द करणे.
१०-२०-३० सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे
सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी देणे,
शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी.
वाढती अनेकविध अभियाने, उपक्रम, निरनिराळे सप्ताह, बहि:शाल संस्थांच्या परीक्षा, ऑनलाईन माहित्या, माहित्यांची वारंवारता हे सर्व ताबडतोब थांबवणे.
'नवीन धोरणानुसार २० किंवा त्यापेक्षा कमी पट असलेल्या शाळांवर केवळ एकच कायम शिक्षक दिला जाणार असून त्यासोबत सेवानिवृत्त शिक्षकाची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाणार आहे. यामुळे शाळांचा दर्जा घसरून त्या बंद पडण्याची भीती वाटते.या निर्णयाला संघटनेचा विरोध आहे.'
- प्रमोद पाटोळे, अध्यक्ष, शिक्षक सेना ठाणे.
'सततची ऑनलाईन माहिती, उपक्रम, १५ मार्च व ५ सप्टेंबर च्या शासन निर्णयामुळे वाडी- वस्तीवरील गोरगरीब मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे.विद्यार्थी विरोधी धोरणाच्या विरोधासाठी शिक्षकांनी मोठ्या संख्येने असहकार आंदोलनात सहभागी व्हावे.'
- विनोद लुटे, निमंत्रक, प्राथमिक शिक्षक समिती, ठाणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.