मुंबई : दोन-तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाच्या अनुभवाने समृद्ध झालेल्या ‘यिन’च्या मंत्र्यांनी (YIN Ministers) आज प्रत्यक्ष शॅडो कॅबिनेटचीच कामगिरी करताना क्रीडामंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्याकडून महाराष्ट्राचे प्रश्न सोडवून घेण्याची कामगिरी फत्ते केली. ‘यिन’च्या व्यासपीठावरून (Young Inspiration Network) मिळालेले प्रशिक्षण आम्ही किती अचूकपणे आत्मसात केले याचे प्रात्यक्षिकही यानिमित्ताने पाहायला मिळाले. त्यांच्या कामगिरीचे सर्वांनीच कौतुक केले.
अधिवेशनात सहभागी झालेल्या ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना गावागावातील प्रश्नांची अचूक जाण असल्याचे त्यांनी केदार यांच्याशी आज केलेल्या संवादातून दिसून आलेच; पण खऱ्या मंत्र्यांसमोर प्रश्न न घाबरता मांडून ते सोडवून घेण्याचे धाडसही त्यांनी दाखवले. निवडणूक प्रचाराला किंवा पाहणी दौऱ्यात सोबत नेण्याचे आश्वासनही मंत्र्यांनी अनेकांना दिले.
८ जानेवारी रोजी विदर्भात झालेल्या गारपिटीचा मुद्दा ‘यिन’ मंत्रिमंडळाच्या एका मंत्र्याने मांडला. त्यावर या विधिमंडळ अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये नुकसानभरपाई मंजूर केली जाईल, असे उत्तर मंत्र्यांनी दिले. अकोल्यासह अनेक तालुक्यांमधील क्रीडा संकुलांची दुरवस्था झाल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. त्यावर यापुढे अशी क्रीडा संकुले स्वयंसेवी संस्थांना चालवण्यास देण्याचा प्रयत्न होईल. यामुळे ग्रामीण क्रीडापटूंना संधी मिळेल. तालुक्यातील क्रीडापटूंना प्रशिक्षक म्हणून नेमले जाईल.
त्याचे परिणाम वर्षभरात दिसतील, असे आश्वासन केदार यांनी दिले. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी दिवसा वीज न मिळता ती रात्री मिळते, हा मुद्दाही अधिवेशनात समोर आला. त्याबाबत आपण समाधानी नाही; पण ही परिस्थिती बदलण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करत आहे. वर्षभरातच शेतकऱ्यांना २४ तास वीज मिळेल, असे आश्वासन केदार यांनी दिले. बीडसह अनेक जिल्ह्यांतील शाळांना मैदान नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांवर त्या शाळांसाठी मैदान उभारण्याबाबत राज्यभर धोरण राबवण्यासाठी मंत्रिमंडळात चर्चा करू, असेही केदार म्हणाले.
मेंढ्यांवर हिंस्र प्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांबाबत विमा काढणे हा उपाय आहे. तसेच फिरते पशुचिकित्सालय सुरू करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. १९६२ हा टोल फ्री क्रमांक फिरवल्यास डॉक्टर गाडीसह गोठ्यात येतील व अशीच गाडी घेऊन मेंढ्यांचा स्वस्तात विमा उतरवला जाईल, असेही केदार यांनी सांगितले.
भ्रष्टाचार संपविण्यासाठी समाजानेच निर्धार करावा
अकोल्यात अनेक क्रीडा अधिकारी एकाच जागी वर्षभर ठाण मांडून बसतात. त्यामुळे भ्रष्टाचार होतो. त्यांच्या बदल्या कराव्यात, या मागणीवर आपण स्वतः विधिमंडळ अधिवेशनानंतर अकोल्यात येऊन ‘यिन’च्या मंत्र्यांना बोलावून हा प्रश्न सोडवू, असेही सुनील केदार म्हणाले. भ्रष्टाचार संपविण्यासाठी समाजानेच निर्धार करावा, असेही त्यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.