मुंबई - शिवसेनेची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी झाली असून, शिवसेनेला स्वतःची भूमिका नाही, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. कॉंग्रेस पक्षाने पुकारलेल्या आजच्या "भारत बंद'मध्ये मनसे सहभागी झाला होता. यावर बोलण्यासाठी राज यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी राज यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेनेवर सडकून टीका केली. ते म्हणाले, की केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणत आहेत, की तेलाच्या किमती आमच्या हातात नाहीत. तर यापूर्वी कॉंग्रेसचे राज्य असताना तुम्ही विरोधी पक्ष म्हणून इंधन दरवाढीविरोधात देशभर आंदोलन केली. मग आताच कसे तुमच्या हातात नाही. खोटे आकडे सांगून हे देशातील जनतेची दिशाभूल करतात. देशाला राजाची गरज आहे, व्यापाऱ्याची नाही, असे सांगत राज म्हणाले, की मोदी आणि शहा हे थापाडे आहेत. भाजपचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. नोटबंदी, जीएसटी सपशेल अपयशी ठरली आहे, तरीही "खोटे बोल, मात्र रेटून बोल' असा खेळ भाजपवाले खेळत आहेत. त्यामुळे जनताच यांना घालवणार आहे. बंद यशस्वी झाला नाही, असे शिवसेना म्हणत आहे, याबाबत विचारले असता ते म्हणाले, की शिवसेनेला स्वतःची भूमिका नाही. त्यांची अवस्था केसाळ कुत्र्यासारखी झाली आहे. पैशाची कामे होत नाही तोपर्यंत सत्तेतून बाहेर पडायचे सोंग करायचे. कामे झाले की परत गप्प बसायचे, अशी शिवसेनेची अवस्था आहे. न्यायालयाचे काय चालले आहे, कळत नाही कार्यकर्त्यांवर अत्यंत निर्दयपणे गुन्हे दाखल केले जात आहेत. यामुळे मनसेचे कार्यकर्ते, नगरसेवक यांना जामीन मिळत नाही. असे घाणेरडे राजकारण भाजप करीत आहे. मात्र, भाजपचे राजकारण त्यांच्याच अंगलट येणार आहे, अशी टिप्पणी करताना न्यायालयाचे काय चालले आहे, हे कळत नाही, असेही राज म्हणाले. |