आदर्श शिक्षक पुरस्काराचा वाद चिघळला
माध्यमिक शिक्षक पुरस्कारापासून वंचित; २०२२ पासून सोहळाच नाही
पाली, ता. ४ (वार्ताहर) ः रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात येणारे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यासाठी १७ जणांची निवड करण्यात आली आहे; मात्र माध्यमिक शिक्षण विभागातील आदर्श शिक्षक पुरस्कारांची यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांवर हा अन्याय आणि दुजाभाव का, असा सवाल शिक्षकांकडून विचारला जात आहे. शिवाय २०२२ पासून पुरस्कार सोहळाही झालेला नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
शासनाकडून प्राथमिक विभागातील आदर्श शिक्षक पुरस्काराची यादी दरवर्षी जाहीर केली जाते; मात्र २०२२, २०२३ व २०२५ वर्षांची माध्यमिक विभागाद्वारे माध्यमिक शिक्षकांच्या पुरस्काराच्या नावांची यादीही प्रसिद्ध केली गेलेली नाही. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. माध्यमिक शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव दरवर्षी सादर केला जातो; मात्र माध्यमिक आदर्श शिक्षक पुरस्कारांची यादी जाहीर केली जात नसल्यामुळे विभागाच्या शिक्षकांमध्ये नाराजी व असंतोष आहे. तसेच त्यांनी दिलेल्या प्रस्तावांचेदेखील काय होते. याबाबत ही माहिती माध्यमिक शिक्षकांना मिळत नाही. मागील वर्षी जाहीर झालेल्या माध्यमिक आदर्श शिक्षकांना अजूनही पुरस्कार दिलेला नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे.
................
जिल्हा परिषदेच्या कोणत्याही माध्यमिक शाळा नाहीत. त्यामुळे त्यांची आदर्श शिक्षक पुरस्कार नावे जिल्हा परिषदेकडून जाहीर होऊ शकत नाही. यावर्षी जाहीर झालेल्या जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षकांना पुरस्कार देण्यासाठी शिक्षक पुरस्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात येईल.
- नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
...........
पुरस्कार जाहीर मात्र समारंभ नाही
२०२२ पासून शिक्षकदिनाला जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण केलेले नाही. याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून प्रशासकीय राजवटीचे कारण दरवर्षी पुढे केले जात आहे; मात्र शिक्षकांकडून निवडणुकीची व इतर अनेक प्रकारची अशैक्षणिक कामे करून घेताना प्रशासकीय राजवट आड का येत नाही, फक्त शिक्षकदिनाला पुरस्कार देतानाच प्रशासकीय राजवट आडवी का येते, इतर जिल्ह्यातही प्रशासकीय राजवट आहे. मग त्या जिल्ह्यात दरवर्षीच शिक्षकदिनानिमित्त पुरस्कारांचे वितरण कसे होते, असा सवाल विचारला जात आहे. याबरोबरच जिल्हा शिक्षक पुरस्कारांसाठी निधीच्या तरतुदीचे एक कारण पुढे केले जाते. मग जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प दरवर्षी जाहीर केला जात नाही का, जिल्ह्यात इतर विकासकामांना निधी कसा मंजूर केला जातो. इतरही कार्यक्रम केले जातात, मग फक्त शिक्षक पुरस्कारांसाठीच निधीची कमतरता का, असे प्रश्नदेखील उपस्थित केले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.