बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सतर्क
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना
अलिबाग, ता. १६ : अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने बालविवाह रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सर्व संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून, जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, शिक्षणाधिकारी व बालकल्याण समिती सदस्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. उपायुक्त (बालविकास) यांनी ‘जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये,’ असे स्पष्ट निर्देश दिले.
धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, समुद्रकिनाऱ्यांवरील हॉटेल्स व पर्यटनस्थळांवर विशेष पाळत ठेवली जाणार असून ग्रामीण व आदिवासी भागात अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार मुलीचे वय १८ व मुलाचे २१ वर्षे असणे बंधनकारक आहे. उल्लंघन केल्यास पालकांसह विवाह लावणारे व उपस्थितांवर गुन्हा दाखल होऊन एक लाख दंड व दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.