जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे संकट कायम
३७१ बालके बाधित; ४१ तीव्र कुपोषित, प्रशासनासमोर मोठे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १९ : रायगड जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न अद्याप गंभीर असून, प्रशासनाच्या उपाययोजनांनंतरही कुपोषित बालकांची संख्या चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले आहे. महिला व बालकल्याण विभागाने मार्च २०२६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ३७१ बालके कुपोषित आढळली आहेत. त्यामध्ये ४१ बालके तीव्र कुपोषित, तर ३३० बालके सौम्य कुपोषित आहेत.
जिल्हा महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागाकडून सहा वर्षांपर्यंतच्या बालकांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते. दरवर्षी जानेवारी ते एप्रिल महिन्यात कुपोषणाचे सर्वाधिक प्रमाण असल्याचे आढळून येते. आदिवासी कुटुंब याच कालावधीत रोजगारासाठी स्थलांतर करीत असतात, जंगल भागात अन्नाचा तुटवडा, पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या याचा परिणाम दुर्गम भागातील आदिवासी बालकांवर होत असतो. या मोहिमेत एकूण ९४ हजार ६१३ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३७१ बालके कुपोषणाच्या विळख्यात असल्याची माहिती जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने दिलेल्या अहवालावरून दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बालआरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कुपोषण रोखण्यासाठी शासनाकडून विविध स्तरांवर योजना राबविल्या जात आहेत. अंगणवाड्यांमधून पूरक पोषण आहार दिला जातो. तसेच सरकारी रुग्णालये व महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून कुपोषित बालकांच्या उपचारासाठी बाल संगोपन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असला, तरी प्रत्यक्षात अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
दरम्यान, वाढती आकडेवारी लक्षात घेता प्रशासनाने योजनांची केवळ अंमलबजावणी न करता त्यांचे प्रभावी निरीक्षण, पालकांमध्ये जनजागृती आणि दुर्गम भागात विशेष मोहीम राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. बालकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.
दुर्गम भागात कुपोषण
विशेषतः दुर्गम व आदिवासी भागात कुपोषणाची समस्या अधिक तीव्र असल्याचे दिसते. रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, सुधागड-पाली या तालुक्यांमध्ये हे सर्वाधिक प्रमाण आहे. आदिवासी विभागाकडील पोषण आहार योजनांच्या निधीत झालेली घट, गाव व तालुका पातळीवरील समित्यांचे निष्क्रिय अस्तित्व, तसेच शासनाकडून दिल्या जाणाऱ्या पाकीट आहाराबाबत मुलांमध्ये असलेली अनास्था ही कुपोषणामागील प्रमुख कारणे मानली जात आहेत.
जिल्ह्यातील बालके दृष्टिक्षेपात
* तपासणी केलेली बालके - ९४ हजार ६१३
* तीव्र कुपोषित बालके - ४१
* सौम्य कुपोषित बालके - ३३०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.