चिमुरड्यांची शाळेला जाण्याची वाट झाली मोकळी
मनसेच्या पाठपुराव्याला यश
महसूल प्रशासनाचे आदेश
पाली, ता. २३ (वार्ताहर) ः सुधागड तालुक्यातील कौलोशी आदिवासीवाडीवरील चिमुरड्यांची शाळेत जाण्याची वाट मोकळी झाली आहे. मनसेच्या पाठपुराव्यानंतर महसूल प्रशासनाने तत्काळ दखल घेत मंगळवारी (ता. २३) प्रत्यक्ष जागेवर जाऊन विद्यार्थ्यांसाठी पायवाट करून देण्यात आली. यामुळे चिमुरड्या विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पालकांनी आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
कौलोशी कातकरवाडी येथील लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी हक्काचा रस्ता उपलब्ध नव्हता. त्यातच एका विकसकाने आपल्या जागेभोवती मोठे सिमेंटचे कंपाउंड घातल्यामुळे विद्यार्थ्यांची एकमेव पाऊलवाटही बंद झाली होती. या परिस्थितीबाबत मनसेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला थेट इशारा दिला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सुधागडचे तहसीलदार उत्तम कुंभार यांनी तत्काळ आदेश जारी केले. या आदेशानुसार, मंगळवारी २३ जून रोजी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. या वेळी विकसकाने त्यांच्या जागेतून विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्यासाठी बाजूने पायवाट मोकळी करून दिली.
या वेळी प्रत्यक्ष जागेवर मनसेचे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी रुपेश भाडीकर आणि तलाठी रवींद्र बाइत यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. मनसेच्या या आंदोलनात्मक पाठपुराव्याला यश आल्याने संपूर्ण परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
फोटो ओळ, पाली, विद्यार्थ्यांसाठी पायवाट मोकळी करून दिल्यानंतर उपस्थित मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे व महसूल विभागाचे अधिकारी. (छायाचित्र, अमित गवळे)