महाड, ता. १४ (बातमीदार) : शेतीमध्ये विविध प्रयोग करून पिकांची उत्पादकता वाढविणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भातपीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत सर्वसाधारण व आदिवासी गटाला बक्षिसे जिंकण्याची संधी यातून मिळणार आहे.
प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना मिळेल व त्यातून उत्पादकता वाढेल हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबवण्यात येत आहे.
स्पर्धेसाठी ११ पिकाचा सहभाग
पीक स्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल, खरीप हंगामासाठी स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशी पिके आहेत.
अशी आहेत बक्षिसे
पीक स्पर्धा विजेत्यांसाठी तालुका पातळी-सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस पाच हजार रुपये, दुसरे बक्षीस तीन हजार रुपये, तिसरे बक्षीस दोन हजार रुपये, जिल्हा पातळी- सर्वसाधारण व आदिवासी गट पहिले बक्षीस १० हजार, दुसरे बक्षीस सात हजार, तिसरे पाच हजार रुपये, विभाग पातळी- सर्वसाधारण व आदिवासी गट पहिले बक्षीस २५ हजार, दुसरे बक्षीस २० हजार, तिसरे बक्षीस १५ हजार रुपये, राज्य पातळी- सर्वसाधारण व आदिवासी गट पहिले बक्षीस ५० हजार, दुसरे ४० हजार, तर तिसरे बक्षीस ३० हजार रुपये आहे.
अर्ज दाखल असा करा
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे. पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, ७/१२ ८ अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषी कार्यालयात द्यावे. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. पीक स्पर्धेत सहभागी लाभार्थीच्या शेतावर भातपिकासाठी किमान २० गुंठे व इतर पिकांसाठी ४० गुंठे क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
यंदा खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज सादर करून भातपीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. याकरिता जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधावा.
- वंदना शिंदे, कृषी अधिकारी, रायगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.