चवदार तळ्याच्या स्वच्छतेसाठी एक कोटींचा निधी मंजूर
सत्याग्रह शताब्दीनिमित्त सुशोभीकरणावर भर
महाड, ता. ९ (बातमीदार) : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्यातील पाण्याचा उपसा करून त्यातील गाळ काढण्याकरिता राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून एक कोटींच्या निधीला विशेष मंजुरी दिली आहे. २० मार्च २०२७ला चवदार तळे सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर तलाव परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
२०२१ च्या महापुरानंतर महाड नगर परिषदेने तळ्यातील गाळ काढला होता. मात्र, आता पाच वर्षांनी पुन्हा गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. चवदार तळ्यातील पाणी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर ओझोन टेक्नॉलॉजी वापरून शुद्ध ठेवले जाते. ही प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी आणि तळ्यातील जलस्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी पाण्याचा उपसा करून साचलेला गाळ काढावा लागणार आहे. याकरिता सामाजिक न्याय विभागाने बुधवारी (ता. ८) ९९ लाख ८५ हजार ८०७ रुपयांच्या निधीला विशेष मंजुरी दिली आहे. हे सर्व काम महाड नगर परिषदेकडून केले जाणार आहे. चवदार तळ्यातील पाण्याचा उपसा केल्यानंतर तळ्याच्या परिसरात असलेल्या विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी कमी होत असते, असा यापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे हे काम करताना परिसरातील नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नाचाही विचार नगरपालिकेला करावा लागणार आहे.
शंभर वर्षे पूर्ण होणार
महाड येथील चवदार तळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ला चवदार पाणी प्राशन करून अस्पृश्यतेविरोधात लढा दिला होता. यामुळे चवदार तळे जागतिक नकाशावर आले आहे. अशा या चवदार तळ्याला भेट देण्यासाठी देशभरातून डॉ. आंबेडकरांचे हजारो अनुयायी येत असतात. याशिवाय दरवर्षी चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिनानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दीदेखील होत असते. वर्षभरात या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. पुढील वर्षी चवदार तळे सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने राज्य सरकारकडून चवदार तळे परिसर व सुशोभीकरणासाठी विविध कामे हाती घेतली जाणार आहेत.