आयटी इंजिनिअर यज्ञेश वैद्य बनले शेतकरी
कोकणातील तरुणांपुढे ठेवला आदर्श
महाड, ता. १५ (बातमीदार) : ठाणे येथील एका नामांकित इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनीत कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले महाड तालुक्यातील चोचिंदे गावचे रहिवासी यज्ञेश वैद्य यांनी तंत्रज्ञान, शासकीय योजना आणि मेहनत या त्रिसूत्रीचा वापर करून यशस्वी शेती उद्योजक म्हणून आपली वाटचाल सुरू केली आहे.
आजकाल गावातील अनेक तरुण आपली जमीन विकून शहराकडे स्थलांतरित होत आहेत, परंतु याला यज्ञेश यांनी बगल दिली आहे. आयटी क्षेत्रातील चांगल्या पगाराची नोकरी असूनही गावच्या मातीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. वडिलोपार्जित शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन कौशल्य वापरून त्यांनी बदल घडवण्याचे ठरवले. सुट्टीच्या दिवशी आणि वीकेंडला गावी येऊन त्यांनी संपूर्ण नियतोोजन केले.
यज्ञेश यांना या वाटचालीत सहाय्यक कृषी अधिकारी बजरंग दाबेकर आणि उप कृषी अधिकारी किरण कोकरे यांचे मार्गदर्शन लाभले. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून आंबा लागवड केली. पहिल्या ३-४ वर्षांत आंब्यापासून उत्पन्न नसल्याने त्यांनी आंतरपीक म्हणून पपईची लागवड करून जमिनीचा व वेळेचा पुरेपूर वापर केला. पाण्याची शाश्वत सोय असावी, याकरिता फळबागेसाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे खोदले. यासाठी त्यांना ७५ हजार रूपये अनुदान मिळाले. शेततळ्यातील पाणी झिरपून वाया जाऊ नये, म्हणून राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेततळे अस्तरीकरण करून घेतले, त्यासाठी ६७ हजार २७६/- रूपयांचे अनुदान मिळाले. संपूर्ण बागेला ठिबक सिंचन जोडले आहे. त्यामुळे पाण्याच्या कमी वापरामध्ये बाग फुलवणे शक्य झाले आहे.
चौकट
उद्योजकतेची कास
यज्ञेश यांची खरी ओळख त्यांच्या दूरदृष्टीत आहे. केवळ कच्चा माल विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी ०.३० हेक्टर क्षेत्रावर शेवग्याची लागवड केली आहे.
कोट
उच्चशिक्षित तरुणांनी नोकरीसोबतच शेतीकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिल्यास शेती नक्कीच फायद्याची ठरते हे यज्ञेश वैद्य यांनी दाखवून दिले आहे.
- किरण कोकरे (उप कृषी अधिकारी, महाड)
....... ....
फोटो - कृषी अधिकारी किरण कोकरे
शेततळे, शेतकरी व अधिकारी