मुंबईतील ८२० रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ७.६२ कोटींची मदत
कोकण विभागात ठाणे आघाडीवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मोठा आधार ठरत आहे. विशेषतः मुंबई शहर व उपनगरांतील रुग्णांनी या योजनेचा मोठा लाभ घेतला असून, जानेवारी ते जुलै २०२५ या कालावधीत एकूण ८२० रुग्णांना सात कोटी ६२ लाख ४४ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई शहरातील ४२८ रुग्णांना चार कोटी एक लाख १५ हजार रुपये, तर उपनगरांतील ३९२ रुग्णांना तीन कोटी ६१ लाख २९ हजार रुपयांची मदत मिळाली आहे.
मुंबईसह संपूर्ण कोकण विभाग आणि अन्य जिल्ह्यांतूनही गरजू रुग्णांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे. कोकण विभागातील एकूण २,७३८ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २५ कोटी ८६ लाख ३७ हजार रुपयांची मदत देण्यात आली. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक १,३३८ रुग्णांना १२ कोटी १० लाख १० हजार रुपयांची मदत मिळाली आहे. रायगड जिल्ह्यात २१९ रुग्णांना एक कोटी ९७ लाख तीन हजार, पालघर जिल्ह्यात १५३ रुग्णांना एक कोटी २८ लाख ४१ हजार, रत्नागिरी जिल्ह्यात १६४ रुग्णांना एक कोटी ३० लाख ६० हजार, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४४ रुग्णांना ५७ लाख ७९ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहता, केवळ मुंबईपुरतीच नव्हे, तर संपूर्ण कोकण विभागातील गरजू रुग्णांपर्यंतही ही मदत वेळेत पोहोचल्याचे दिसते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या योजनेमध्ये पेपरलेस प्रणाली, जिल्हास्तरीय मदत कक्ष आणि विविध शासकीय आरोग्य योजनांचा समन्वय साधून प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यात आली आहे. रुग्णांनी प्रथम महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजना वापराव्यात. त्या अपुऱ्या ठरल्यास संबंधित रुग्णालयातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज करता येतो.
या निधीतून कॉक्लियर इम्प्लांट, हृदय, किडनी, यकृत, फुप्फुस, बोन मॅरो, हिप व गुडघा प्रत्यारोपण, कर्करोग (शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन), मेंदूचे आजार, डायलिसिस, अपघातग्रस्त रुग्ण, नवजात बालकांचे आजार, भाजलेले व विद्युत अपघातग्रस्त रुग्ण अशा २० गंभीर आजारांवर उपचारासाठी मदत दिली जाते.
अर्जासाठी रुग्णाचे आधार व रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १.६० लाखांपेक्षा कमी), वैद्यकीय अहवाल, खर्चाचे प्रमाणपत्र, रुग्णालयाची नोंदणी, रुग्ण दाखल असल्यास जिओ टँग फोटो, अपघात असल्यास एफआयआर आणि अवयव प्रत्यारोपणासाठी झेडटीसीसी नोंदणी आवश्यक आहे. सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात aao.cmrf-mh@gov.in या ई-मेलवर पाठवावीत. अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा
संपूर्ण राज्यात पेपरलेस प्रणाली आणि पारदर्शक कामकाजामुळे गरजू रुग्णांपर्यंत वेळेत मदत पोहोचते आहे. मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांतही याचा प्रभावी लाभ रुग्णांना मिळतो आहे. हे कार्य आणखी व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
-रामेश्वर नाईक,
प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.