रिक्षाचालकांची दादागिरी
नियमापेक्षा जादा भाडे; प्रवाशांच्या खिशाला कात्री
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ ः रेल्वेस्थानक असो किंवा बसस्थानकापासून इच्छितस्थळ दूर असल्याने अनेकांना रिक्षाचा पर्याय स्वीकारावा लागतो. याचाच गैरफायदा घेत शेअर रिक्षाचालक प्रवाशांची लूट करत आहेत. तसेच त्याठिकाणी मीटर रिक्षा थांबू नये, यासाठी दादागिरी करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
रिक्षाचालक अनेकदा प्रवाशांशी मुजोरीने वागतात, अरेरावी करतात. वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. जादा प्रवासी, जलद मीटर, भाडे नाकारणे आदी कारणांसाठी मुंबई पश्चिम, मुंबई पूर्व आणि बोरिवली या विभागांतर्गत कारवाई करण्यात येते; मात्र रिक्षाचालक सुधारताना दिसत नाहीत.
कांजूरमार्ग परिसरात शेअर रिक्षांच्या दरात कोणतीही अधिकृत परवानगी न घेता १२ रुपयांऐवजी थेट १५ रुपये अद्याप आकारले जात आहेत. या वाढीमुळे स्थानिक प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. पूर्वी शेअर रिक्षादर फक्त १० रुपये होते. महागाईचे कारण देत रिक्षा संघटनेने १५ रुपये केले. तर चेंबूर कॅम्प ते वाशीनाका म्हाडा येथे शेअर रिक्षाने १० रुपये आकारले जातात; परंतु सकाळी बसला गर्दी असल्याने शेअर रिक्षाचालक १५ रुपये घेतात. नाईलाजाने प्रवाशांना तो पर्याय स्वीकारावा लागतो.
गोरेगाव रेल्वेस्थानकाबाहेर (पश्चिम) शेअर रिक्षाचालकांची गर्दी असते. दीड किलोमीटरपेक्षा कमी अंतर असेल तिथे २६ रुपये देऊन तीन जण प्रवास करू शकतात; पण शेअर रिक्षाचालक मीटर रिक्षाचालकांना थांबू देत नाहीत. त्यामुळे तीन जण सोबत प्रवास करत असतील तर त्यांना ३९ रुपये मोजावे लागतात. त्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे नियम ?
शेअर रिक्षा नियमित भाड्यापेक्षा ५० टक्के भाडे जास्त आकारते. म्हणजे २६ रुपये मीटर होत असेल, तर ३९ रुपये आकारले जाते.
तीन प्रवासी नियम उल्लंघन
शेअर रिक्षाला ५० टक्के भाडे जास्त असते; परंतु त्यासाठी तीन प्रवाशांची मर्यादा पालन करणे आवश्यक आहे. त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे. काही रिक्षाचालक चार तर काही जण पाच प्रवासी घेत आहेत.
प्रवाशांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन तपासात दोषी आढळणाऱ्या रिक्षाचालकांवर अनुज्ञप्ती निलंबन, परवाना निलंबन आणि दंडात्मक कारवाई केली जात आहे.
- विवेक भीमनवार,
परिवहन आयुक्त
नावापुरती कारवाई
शेअर रिक्षात अतिरिक्त प्रवासी बसवले जातात. ते माहिती असूनही वाहतूक पोलिस दुर्लक्ष करीत आहेत. तसेच आरटीओ विभाग नावापुरती कारवाई करत आहेत. अंधेरी, जोगेश्वरी, वांद्रे, मालाड, कांदिवली, सांताक्रूझ, कुर्ला, मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर आदी ठिकाणी रिक्षात पाच प्रवासी बसवले जातात. त्यामुळे चांगल्या रिक्षाचालकांचे नुकसान होत आहे.
- के. के. तिवारी,
अध्यक्ष, भाजप रिक्षा-टॅक्सी विभाग
अनेक वर्षांपासून कांजूरमार्ग पूर्व ते कामगार आघाडी याठिकाणी ये-जा करणाऱ्या शेअर रिक्षांचे भाडे प्रतिव्यक्ती १० रुपये आकारण्यात येत होते. स्थानिक रिक्षाचालकांनी आता कोणतीही सूचना न देता थेट १५ रुपये आकारण्यास सुरुवात केली आहे. शेअर रिक्षाचालक नियम पाळत नसतील, तर शेअर रिक्षा बंद करत नियमाने मीटर रिक्षा सुरू कराव्यात.
- तान्हाजी मोरे,
कांजूरमार्ग विभागप्रमुख,
शिवसेना (ठाकरे गट)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.