शालेय मुलांसाठी एसटीची ‘हेल्पलाइन’
एसटी प्रवासात मिळणार तत्काळ मदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी, यासाठी लवकरच एसटी महामंडळाची ‘हेल्पलाइन’ सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शनिवारी दिली.
धाराशिव मध्यवर्ती बसस्थानकाला भेट दिल्यानंतर तेथील विद्यार्थी-विद्यार्थिनींशी त्यांनी संवाद साधला. राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाने मानव विकास निधीअंतर्गत दुर्गम व आदिवासीबहुल भागात विद्यार्थ्यांसाठी ‘मानव विकास बस’ उपलब्ध केल्या आहेत. त्या बस शालेय विद्यार्थ्यांसाठी वापरण्याच्या सक्त सूचना आहेत. अनेक आगारांत या नियमाची पायमल्ली केलेली दिसून येते. धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रताप सरनाईक यांच्याकडे बसस्थानकातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींनी समस्या व तक्रारी मांडल्या.
अनेक शालेय बस वेळेवर न सुटणे, गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे, बस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. अचानक बस रद्द झाल्याने संध्याकाळी तासन्तास रखडपट्टी हाेते. त्यामुळे गैरसमजातून पालकांकडून ओरडाही खावा लागताे. यामुळे आत्महत्येच्या घटनाही घडल्याचे सांगून एसटीच्या स्थानिक प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
----
विभाग नियंत्रकाशी
संपर्क करता येणार!
शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य ती मदत मिळावी, यासाठी लवकरच एसटी महामंडळाची ‘हेल्पलाइन’ सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी शनिवारी दिली.
शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना शाळेतून ये-जा करताना येणाऱ्या अडचणी साेडवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. याअंतर्गत ३१ विभागांतील सर्व विभाग नियंत्रकांचे संपर्क क्रमांक संबंधित शाळा-महाविद्यालयांना देण्यात येतील. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मुख्याध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी विभाग नियंत्रकांना संपर्क करून समस्या मांडू शकतील, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
-----
...तर निलंबनाची कारवाई!
एसटी बससंबंधी अडचणींमुळे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व त्यांचे पर्यवेक्षक यांना जबाबदार धरण्यात येईल. बसफेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचे जितक्या दिवसांचे शालेय नुकसान होईल तितके दिवस जबाबदार पर्यवेक्षक अथवा अधिकाऱ्यांना निलंबित अथवा सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांना दिले आहेत.