८, ९ डिसेंबरला १५ टक्के पाणीकपात
जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी तानसा जलवाहिनी बदलण्याचे महत्त्वाचे काम महापालिकेमार्फत हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे शहरातील १७ प्रशासकीय विभागांमध्ये १५ टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. ही पाणीकपात सोमवारी (ता. ८) सकाळी १० वाजल्यापासून ते मंगळवारी (ता. ९) सकाळी १० वाजेपर्यंत राहील.
तानसा धरणातून भांडुप जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या २,७५० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी बसविण्यासाठी सुमारे २४ तासांचा कालावधी आवश्यक असल्याने या काळात जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा सुमारे १५ टक्क्यांनी घटणार आहे. या कामाचा परिणाम मुंबई शहरात ए, सी, डी, जी-दक्षिण, जी-उत्तर विभागांत, पश्चिम उपनगरांत एच-पूर्व, एच-पश्चिम, के-पूर्व, के-पश्चिम, पी-दक्षिण, पी-उत्तर, आर-दक्षिण, आर-उत्तर, आर-मध्य विभागांत आणि पूर्व उपनगरात एन, एल, एस विभागांत होणार असून एकूण १७ प्रशासकीय विभागांत १५ टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. यापूर्वी बुधवारी (ता. ३) आणि गुरुवारी (ता. ४) हे काम नियोजित होते; मात्र भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला गैरसोय होऊ नये म्हणून ते काम पुढे ढकलण्यात आले होते. आता सोमवारी व मंगळवारी जलवाहिनी बदलण्याचे काम पार पडणार आहे. महापालिकेने सर्व संबंधित नागरिकांना आवाहन केले आहे, की आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा, पाणी जपून वापरावे, महापालिकेला सहकार्य करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.