मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व वॉर्ड-तालुका कमिट्या बरखास्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबईतील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व वॉर्ड व तालुका कमिट्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील अधिकृत घोषणा आझाद मैदान येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी ही माहिती देताना सांगितले, की येत्या ५ एप्रिलपर्यंत नव्या वॉर्ड व तालुका कार्यकारिणीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी २५ फेब्रुवारीपासून सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात येईल. नोंदणीकृत व क्रियाशील सदस्यांनाच निवडणुकीत सहभागी होता येणार आहे. मुंबईत सर्व वॉर्ड अध्यक्ष, वॉर्ड कमिट्या तसेच तालुकाध्यक्ष व तालुका कमिट्यांची निवड ही निवडणुकीद्वारेच करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश आठवले यांनी दिले आहेत. ठरलेल्या मुदतीत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पक्षसंघटनेत नव्या जोमाने कामकाज सुरू करण्यासाठी आणि तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कासारे यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब गरुड, प्रदेश सरचिटणीस विवेक पवार, कोषाध्यक्ष सुनील मोरे आदी उपस्थित होते.