होळीसाठी मध्य रेल्वेच्या ८६२ विशेष गाड्या
प्रवाशांसाठी स्थानकांवर सुविधा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नियमित गाड्यांव्यतिरिक्त ८६२ होळी विशेष गाड्या चालवल्या आहेत. सणापूर्वीच्या चार दिवसांत (२७ फेब्रुवारी ते २ मार्च) या नियमित आणि विशेष गाड्यांमधून एकूण २४ लाख १८ हजार प्रवाशांनी प्रवास केला. यामध्ये मुंबईहून सुमारे सात लाख प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
या विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित गाड्या, अनारक्षित विशेष गाड्या तसेच वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असलेल्या गाड्यांचा समावेश आहे. यापैकी ६७० विशेष गाड्या मध्य रेल्वेने चालवल्या असून, त्यामध्ये १०५.०६ टक्के प्रवासी उपस्थिती नोंदविण्यात आली आहे.
प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्रातील अंतर्गत प्रवासासाठी ४०९ गाड्या चालविण्यात आल्या. त्याशिवाय उत्तर प्रदेशसाठी १४२, बिहारसाठी ८२ आणि गोव्यासाठी २१ विशेष गाड्या चालविण्यात आल्या. देशभरातील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी या गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे सणाच्या काळातील प्रवासी गर्दी कमी करण्यास मदत झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
...
प्रमुख स्थानकांवर विशेष व्यवस्था
होळीच्या काळात वाढलेल्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि पुणे या प्रमुख स्थानकांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी होल्डिंग एरिया, शेड, पुरेसा प्रकाश, पिण्याचे पाणी, पंखे, शौचालये, मोबाईल चार्जिंग पॉइंट तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच तिकीट तपासणी कर्मचारी आणि रेल्वे संरक्षण दलाच्या पथकांमार्फत प्रभावी गर्दी नियंत्रणाची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक स्थानकांवर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोबाईल यूटीएस सहाय्यकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
...
गाड्यांच्या मागणीचे सतत निरीक्षण
प्रवाशांची मागणी लक्षात घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून माध्यमे, सामाजिक माध्यमे, रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ तसेच आरक्षण प्रणालीतील प्रतीक्षा यादीतील प्रवाशांची माहिती सातत्याने तपासली जाते. त्यानुसार आवश्यकतेनुसार गाड्यांची संख्या आणि फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला जातो. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वॉर रूमच्या मदतीने तिकिटांची उपलब्धता आणि प्रवाशांच्या प्रवासाचा कल यावर रिअल-टाइम निरीक्षण ठेवले जात असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.