गणपतराव कदम मार्गावरील कोंडी फोडण्याचा प्रयत्न
तीन महिने वाहतूक बदल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबई कोस्टल मार्ग चालू झाल्यापासून आणि एल्फिन्स्टन पूल वाहतुकीस बंद झाल्याने गणपतराव कदम मार्गावर वाहतूक कोंडी वाढली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी तीन महिने वाहतूक बदल करण्यात आला आहे.
वरळी वाहतूक विभागातील गणपतराव कदम मार्गावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गणपतराव कदम मार्गावर श्रीराम मिल नाका येथे दैनिक शिवनेर मार्ग आणि एस. एस. अमृतराव मार्ग हे दोन्ही मार्ग येऊन मिळतात त्या ठिकाणी वाहनांना वळण घेण्यासाठी जागा कमी असल्याने एखाद्या वाहनाने एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर जाण्यासाठी उजवे वळण घेतले तर मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यामुळे श्रीराम मिल नाका येथे चारही दिशांनी येणाऱ्या वाहनांना उजवे वळण घेण्यास प्रतिबंध केले, तर वाहतूक कोंडीच्या समस्येला आळा बसू शकतो. त्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी उजवे वळण बंद करण्यात आले आहे. हे वाहतूक बदल ११ जून २०२६पर्यंत लागू असणार आहेत.
...
कोठे, कोणते बदल? (वेळ सकाळी ७ ते रात्री ११)
१) एस. एस. अमृतवार मार्गावरून गणपतराव कदम मार्गावर आल्यावर डावे वळण घेऊन यादव चौकाकडे जाता येईल; परंतु उजवे वळण घेऊन वरळी नाक्याकडे किंवा सरळ दैनिक शिवनेर मार्गावर जाता येणार नाही.
२) दैनिक शिवनेर मार्गावरून गणपतराव कदम मार्गावर आल्यावर डावे वळण घेऊन वरळी नाक्याकडे जाता येईल; परंतु उजवे वळण घेऊन यादव चौकाकडे किंवा सरळ एस. एस. अमृतवार मार्गावर जाता येणार नाही.
३) वरळी नाक्याकडून उत्तर वाहिनीने श्रीराम मिल नाका येथे आल्यावर डावे वळण घेऊन एस. एस. अमृतवार मार्गावर जाता येईल किंवा सरळ यादव चौकाकडे जाता येईल; परंतु उजवे वळण घेऊन दैनिक शिवनेर मार्गावर जाता येणार नाही.
४) यादव चौकाकडून दक्षिण वाहिनीने श्रीराम मिल नाका येथे आल्यावर डावे वळण घेऊन दैनिक शिवनेर मार्गावर जाता येईल किंवा सरळ वरळी नाक्याकडे जाता येईल; परंतु उजवे वळण घेऊन एस. एस. अमृतवार मार्गावर जाता येणार नाही.